राज्यात मुसळधार पावसाचे 21 बळी, मान्सूनची मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात धडक

महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होत आहे. मुंबई, पुण्यानंतर आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून पोहचला आहे. मान्सूनपूर्व झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

राज्यात मुसळधार पावसाचे 21 बळी, मान्सूनची मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात धडक
राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Jitendra Zavar | Updated on: May 29, 2025 | 7:24 AM

मान्सून वेळेआधीच राज्यातील सर्व भागांत दाखल होत आहे. आता मान्सून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पोहचला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 22 प्राणी दगावले आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली. सर्वाधिक मृत्यूची नोंद पुणे आणि नांदेड जिल्ह्यात करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी तिघांनी जीव गमावला आहे.

राज्यात मान्सून सक्रीय होऊ लागला आहे. रविवारी राज्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर पुढील २४ तासांत मुंबई, पुणे येथे पोहचला. पुढील दोन दिवस मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे. यामुळे ईशान्येकडील राज्ये, छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये मान्सून पोहचण्याची शक्यता आहे. गुरुवारी विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाला आहे. बुधवारी दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर जळगाव शहरात रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जळगाव शहरासह विविध भागात पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यात झालेला हा पाऊस मान्सून होता.

ढगफुटी सदृश्य पाऊस

जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले. जालनामधील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बदनापूर तालुका आणि परतुर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. नद्याही दुधडी भरून वाहू लागल्या होत्या. इतका मुसळधार पाऊस झाल्यामुळे मे महिन्यात पहिल्यांदाच दुधना सुखना यासह इतर नद्या दुथडी भरून वाहू लागल्या.

शेती पिकांचे नुकसान

मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे वाशीम जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. या पावसामुळे फणसवाडी येथील शेतकऱ्याचे मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us