TV9 Marathi Special : 8 वर्षाच्या चिमुरड्यानं आधी बाहुलीला फाशी दिली आणि नंतर स्वत: जीव दिला, हा नेमका कशाचा प्रभाव? मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात?

| Updated on: Jun 01, 2022 | 6:19 PM

हातात मोबाइल दिला की मुलं शांत बसतात किंवा बाहेर खेळायला गेली की तीन-चार तास निवांत.. असं असेल तरीही मोबाइलवर मुलं काय बघतात किंवा मित्रांसोबत खेळायला गेली तरी ती कुणासोबत खेळतात, याकडे पालकांचं लक्ष असायला हवं.

TV9 Marathi Special : 8 वर्षाच्या चिमुरड्यानं आधी बाहुलीला फाशी दिली आणि नंतर स्वत: जीव दिला, हा नेमका कशाचा प्रभाव? मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणेः पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) आज एक भयंकर घटना घडली. ऐकून, वाचून पोटात कालवाकालव झाली. आठ वर्षाच्या एका मुलानं आधी त्याच्या बाहुलीला (Dall) फाशी (Hanged) दिली आणि त्यानंतर स्वतः तोंडावर तसंच कापड टाकत गळफास घेतला. ऐकतानाच काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या बातमीनं अवघा महाराष्ट्र हादरलाय. पण आठ वर्षाचा चिमुरडा एवढं भयंकर कृत्य कसं करु शकतो? हा प्रकार त्याने खेळा-खेळात केला की कशाचा राग मनात धरत त्याने हे कृत्य केलं? या प्रकरणाचा उलगडा पोलीस करत आहेत. तूर्तास हाती आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील या मुलाला हॉरर फिल्म बघण्याची सवय होती, असे पुढे आले आहे. त्यामुळे त्याने जे पाहिलं, त्याचंच अनुकरण केलं असावं, असा कयास लावला जातोय.

काय घडली नेमकी घटना?

पुण्यात आठ वर्षाचा मुलगा घरात बाहुल्यांसोबत खेळत होता. यावेळी घरात त्याची आईदेखील होती. मुलगा बाहुल्यांसोबत खेळत असल्याचं पाहून आई तिच्या कामात बिझी झाली. बराच वेळ मुलाचा काही खेळण्याचा आवाज आला नाही, म्हणून आईनं डोकावून पाहिलं. तेव्हा आईला मुलगा खिडकीला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तर त्याच्या बाहुलीलाही त्यानं टॉवेलनं फाशी दिली होती. पुण्यातील थेरगाव इथली ही घटना आहे. सदर मुलाचं कुटुंब सोसायटीच्या पायऱ्यांखाली राहतं. मुलाचे वडील गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

हे सुद्धा वाचा

मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात?

आठ वर्षाच्या चिमुरड्याने केलेल्या या कृत्याचं विश्लेषण करताना औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे म्हणतात-

  1.  लहान मुलांसाठी खेळणी ही वास्तव असते. आपण जे काही करतो, ते सगळं ते खेळणीसोबत खेळतात. त्यांना खाऊ घालतात, न्हाऊ घालतात. कपडे घालतात. सदर मुलाने जे मोबाइलमध्ये व्हिडिओ पाहिले असतील, त्याचंच अनुकरण बाहुलीसोबत केलं असावं.
  2. बाहुलीला लटकवल्यावर काही झालं नाही, हे पाहून आपल्यालाही आता काही होणार नाही, असं मुलाला वाटलं असावं. या विचारातूनही त्यानं स्वतःला गळफास घेतला असावा.
  3.  6 ते 14 हा वयोगट सोशल इन्फ्यूएन्सचा काळ असतो. म्हणजेच समाजात आजू-बाजूला ज्या ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी थेट त्याच्यापर्यंत पोहोचतात, त्याचा मुलांवर जास्त परिणाम होतो. सदर मुलापर्यंत अशाच प्रकारचे व्हिडिओ आले असावेत, त्यामुळेच त्याचं अनुकरण झालं असावं.
  4. 6 ते 14 या वयाच्या सुरुवातीची तीन-चार वर्ष तर समाजाचा प्रचंड प्रभाव मुलांवर जाणवत असतो. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, गोष्टी यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. यामुळेच तर काही वर्षांपूर्वी शिनचॅन या कार्टून मालिकेवर बंदी घालण्याची मागणी पुढे आली होती. आई-वडिलांना त्याचं उलटून बोलणं, मस्करी म्हणून कोणत्याही पातळीवर जाणं हे सर्वच मुलांवर प्रभाव करणारं ठरू लागलं.
  5. हातात मोबाइल दिला की मुलं शांत बसतात किंवा बाहेर खेळायला गेली की तीन-चार तास निवांत.. असं असेल तरीही मोबाइलवर मुलं काय बघतात किंवा मित्रांसोबत खेळायला गेली तरी ती कुणासोबत खेळतात, याकडे पालकांचं लक्ष असायला हवं. अर्थात तेसुद्धा मुलांना कळू न देता किंवा त्यांच्यावर एकसारखी पाळत न ठेवता, ते कोणत्या संगतीत आहेत, हे जाणून घेणं पालकांसाठी गरजेचं आहे.