पुणे महापालिकेतील नोकरीचं स्वप्न जास्त वेळ टिकलं नाही, उमेदवारांची मॉडर्न स्टाइल कॉपी, तपासातून धक्कादायक माहिती उघड, चष्मा…
पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेत कॉपी करणाऱ्या तिघांचं नोकरीचं स्वप्न जास्त वेळ टिकलं नाही. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघड झालं आहे. पालिकेच्या परीक्षेत तीन उमेदवारांनी कॉपी केल्याचे उघड झालं आहे. या प्रकरणी तिघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत चष्मात छुपा कॅमेरा बसवून गैरप्रकार केल्याचं समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्हीमधून गैरप्रकार केल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत गजानन पाचे, शिवशंकर शेळगावे ,विष्णुकांत वाघमारे यांनी कॉपी केली होती. तसेच टीसीएसच्या योगेश राठोड आणि विकास गायकवाडची विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी साथ दिली होती. या प्रकरणी सहा जणांविरोधात या आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांची 90 पेक्षा जास्त गुण मिळाल्याने कनिष्ठ अभियंतापदी निवड झाली होती. पुणे महानगरपालिकेने 169 कनिष्ठ अभियंतापदासाठी एप्रिलमध्ये परीक्षा घेतली होती. मुंबई, नागपूर, अमरावती, कोल्हापूर , नांदेड संभाजीनगरला परीक्षा झाली होती. 22 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी कनिष्ठ अभियंतापदासाठी परीक्षा दिली होती.
परीक्षेला किती जण बसले होते?
मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रवर्गाची परीक्षा ही एप्रिलमध्ये महिन्यात घेण्यात आली होती. या प्रवर्गाच्या 169 जागांसाठी तीन दिवस 7 सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत 42 हजारापैकी 20 हजार 700 उमेदवार बसले होते. या परीक्षेचा निकाल हा 9 जून रोजी जाहीर करण्यात आला. उमेदवारांनी मागणी केल्यानंतर 15 जून रोजी विषयनिहाय निकाल जाहीर करण्यात आला. नियमानुसार, 1:3 या प्रमाणात 545 उमेदवारांची निवड यादी करण्यात आली. त्यानंतर त्यांना 1 आणि 2 जुलै रोजी पडताळणीसाठी बोलविण्यात आले होते.
रोहित पवारांकडून अनेक सवाल उपस्थित
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही अनेक सवाल उपस्थित केले. ‘पुणे मनपा कनिष्ठ अभियंतापदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालं. याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलं. तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे अजून किती दिवस खपवून घ्यायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.