Pune Ajit Pawar : राज ठाकरेंची सर्व आंदोलनं फेल अन् समाजासाठी नुकसानकारक, पुण्यात अजित पवारांची सडकून टीका

| Updated on: May 06, 2022 | 3:40 PM

फुकटची प्रसिद्धी आणि त्याचा हव्यास काही राजकारण्यांना हवा असतो. कारण लाखो, करोडो रुपये खर्च करून तो मिळत नाही, अशी टीका राज ठाकरेंवर त्यांनी केली. लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले.

Pune Ajit Pawar : राज ठाकरेंची सर्व आंदोलनं फेल अन् समाजासाठी नुकसानकारक, पुण्यात अजित पवारांची सडकून टीका
राज ठाकरेंच्या आंदोलनावर भाष्य करताना अजित पवार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : माध्यमांनी राज ठाकरे (Raj Thackeray) इथून निघाले, तिथे पोहोचले, स्टेजकडे यायला लागले अशा प्रचारचे कव्हरेज दिले पण त्यांनी केलेले एकही आंदोलन यशस्वी झालेले नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी टीका करत समाचार घेतला. ते म्हणाले, की मागे राज ठाकरे टोलविरोधात (Toll) आंदोलन करणार म्हणाले. पण एक दिवस फक्त टोल नाक्यावर जमले. पुढे काय झाले? राज ठाकरेंची सगळी आंदोलने राज्याला आणि समाजाला नुकसानकारक ठरली. परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केले, टॅक्सीवाल्यांना मारले, पण फेल गेले. नितीन गडकरी म्हणाले होते, की टोलमुळेच अनेक रस्त्यांची कामे झाली. मग टोल बंद केले तर कामे कशी होणार, असा सवाल त्यांनी केला.

‘फुकटच्या प्रसिद्धीचा हव्यास’

परप्रांतियांना चले जाव म्हटले. त्यामुळे अनेक ठिकाणची बांधकामे कामे बंद पडली. बिल्डर म्हटले, आमच्याकडे काम करायला मजूर राहिला नाही. शेवटी त्या लोकांना पुन्हा आणावे लागले. कारण आपल्याकडे ती कामे करणारी माणसेच नाहीत. ते आंदोलन फेल झाले. टॅक्सीवाल्यांना मारले. ते आंदोलन फेल झाले. फुकटची प्रसिद्धी आणि त्याचा हव्यास काही राजकारण्यांना हवा असतो. कारण लाखो, करोडो रुपये खर्च करून तो मिळत नाही, अशी टीका राज ठाकरेंवर त्यांनी केली.

‘आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे’

लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरूनही अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली. लाऊडस्पीकरबाबत नियमावर बोट ठेवायचे म्हटले तर सगळ्यांचीच पंचाईत होईल. आवाजाच्या डेसिबलची मर्यादा मोजायची झाली तर जे सूर्यास्तानंतर सभा घेतात त्यांच्या सभेवर गंडांतर येईल आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतल्यासारखे होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने धमकी दिली आहे, त्याविषयी विचारले असता, तिकडे जाणाऱ्यांनीच याचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.

‘हम करेसो कायदा चालणार नाही’

राणा दाम्पत्यावर लावण्यात आलेल्या राजद्रोहाच्या गुन्हाबाबत सत्र न्यायालयाने मत व्यक्त केले होते. त्यावर आमचे अॅडव्होकेट जनरल आणि वकील अभ्यास करून निर्णय घेतील, असे ते म्हणाले. तर हनुमान चालिसा म्हणायची असेल घरी म्हणा, दुसऱ्याच्या घरात जाऊन कशाला म्हणता. हम करेसो कायदा चालणार नाही आणि अल्टीमेटम तर अजिबात चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्याविषयीही मत व्यक्त करत आयोगाचे काम सुरू असताना यावर बोलणे टाळावे, असे म्हटले. तर राष्ट्रवादीचा कोणीही नेता भिडेंना पाठीशी घालत नाही. जो घालेल तो राष्ट्रवादीचा नाही, असे स्पष्टीकरणही दिले.