जगदंबाची शपथ घेऊन सांगते… अजितदादांना प्रदेशाध्यक्ष बदलायचा होता; रुपाली ठोंबरेंनी टाकला बॉम्ब
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. रुपाली ठोंबरे यांनी 'जगदंबेची शपथ' घेऊन सांगितले की, प्रदेशाध्यक्ष बदलण्याची अजितदादांचीच इच्छा होती. प्रशांत किशोर यांनीही सुनेत्रा पवारांना हाच सल्ला दिल्याने हालचालींना वेग आला आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत पक्षबांधणीसाठी बदल आवश्यक असल्याचे ठोंबरे म्हणाल्या.

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांना एनसीपीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलला तरच मला तुमच्यासोबत काम करणं शक्य होईल, असंही त्यांनी सुनेत्रा पवार यांना सांगितलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर जगदंबेची शपथ घेऊन सांगते, प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती. अजितदादांचं ते स्वप्न होतं, असं म्हणत धुरळा उडवून दिला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांची इच्छा होती. 15 नोव्हेंबरला पुणे मनपा निवडणुकी आधी अजितदादांसोबत भेट झाली. जगदंबाची शपथ घेऊन सांगते, दादांनी तेव्हा सांगितलं होतं मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे. तुम्ही कामाला लागा. आपल्याला पुणे मनपा निवडणूक जोमाने लढायची आहे आणि जिंकायची आहे. माझ्याकडे दादा बोलले तसं प्रत्येक कार्यकर्त्यांकडे बोलले होते. तसेही सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्षपदी राहून दोन तीन वर्ष झाले आहेत. त्यांनी नव्यांना संधी द्यावी. पक्ष मजबूत बांधण्यावर भर द्यावा, असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
झाली ना दोन तीन वर्ष…
अजित पवार असताना काही निर्णय झाले होते. त्याची अंमलबजावणी होणार होती. अजितदादा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलले होते. पण दुर्देवी घटना घडल्यावर सुनेत्रा पवारांकडे जबाबदारी आली. त्यामुळे दादांनी जे ठरवलं होतं, त्या गोष्टी थांबल्या. प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे. अजितदादांची इच्छा होती. झाले दोन तीन वर्ष. मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, असं अजितदादा म्हणाले होते. सीनियर लोकांना माहीत आहे. पण ते बोलत नाही, असं त्या म्हणाल्या. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलणं हा सर्वस्वी निर्णय सुनेत्रा पवार यांचा आहे. पक्ष बांधणीसाठी आणि अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद बदलावा, असं रुपाली ठोंबरे यांनी सांगितलं.
अजितदादांनी सांगूनही…
अजितदादा असताना प्रदेशाध्यक्ष कसे वागायचे याचं उदाहरण सांगते. अजितदादांनी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या आणि पत्र द्यायला सांगितलं तर प्रांतअध्यक्षांनी पत्र द्यायला हवे होते, पण दिरंगाई केली जायची. अजितदादांनी सांगूनही पत्र दिलं जात नसायचं. कार्यकर्त्यांना डावललं जायचं. आमचं तटकरेंशी भांडण नाही, वाद नाही. पण पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी पुढे यावं. प्रदेशाध्यक्षपद सोडावं, असंही त्या म्हणाल्या.
पटेल आणि तटकरे…
यावेळी त्यांनी उमेश पाटील यांच्या पोस्टवरही प्रतिक्रिया केली. उमेश पाटील यांनी पोस्ट केली ती वास्तवतेला धरून केली आहे. दादांसोबतपण ही जुनी मंडळी प्रामाणिकपणे उभे राहिली नाही. दादांची दुर्देवी घटना घडल्यावरही हे लोक पवार कुटुंबांसोबतही उभे राहत नाही. खमकेपणे उभे राहत नाही. सुनेत्रा पवार यांना ताकद आणि बळ द्यायला पाहिजे होते, ते देत नाही. खासकरून तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांकडून हे होत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
बंधू म्हणून उभं राहायला हवं होतं…
मी आरोप करत नाही. आरोप करतो तेव्हा ते खरे किंवा खोटं करावं लागतं. मी वस्तुस्थिती सांगतेय. सुनेत्रा पवारांच्या पाठी बंधू म्हणून उभं राहायला पाहिजे होतं ते होत नाही. पक्षात स्वत:चं स्थान बळकट करण्यासाठी किंवा अजितदादा नंतर पक्षाची धुरा हाती आली नाही म्हणून तसं करत असतील, असा आरोपही त्यांनी केला.