तटकरे, पटेल यांना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची? रुपाली ठोंबरे पाटील यांनी ठेवणीतील बाण सोडलाच, राजीनाम्याचा मुद्दाही रेटला
Rupali Thombre on Sunil Tatkare: राष्ट्रवादी मजबूत होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. तटकरेंविरोधात त्यांनी तक्रारीचा सूर आळवला. दादा पक्षात असतानाच प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला होता असा दावा त्यांनी केला.

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मोठी करण्यासाठी मोठ्या बदलाची नांदी दिली आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षापासून बदलास सुरूवात करण्याची सूचना केल्याचे समजते. राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमण्यावरून वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीत मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधात तक्रारींचा सूर आळवला. तर त्यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांच्यावर एक गंभीर आरोप केला.
राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलावा
काल रुपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली होती. अजितदादा असताना पक्षात काही निर्णय झाले होते. त्याची अंमलबजावणी होणार होती. अचानक अजितदादांची ती दुर्दैवी घटना घडली. ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. काल प्रशांत किशोर यांनी सांगितले की प्रांत अध्यक्ष बदलल्याशिवाय मी काम करणार नाही. रणनितीकार निवडणे हा पक्षाचा अधिकार आहे. प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजे. अजितदादांची तीच इच्छा होती. प्रदेशाध्यक्ष बदलणार हेच अजितदादांनी आम्हाला सांगितले होते. कदाचित माझ्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत, मंत्री आहेत. त्यांना ही गोष्ट माहिती आहे. पण ते बोलणार नाहीत. पण का बोलायचं नाही. जर पक्ष संघटन मजबूत करायचं असेल तर बदल व्हायला हवा, असे रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.
पक्ष संघटनेसाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी आणि अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी दादांची इच्छा होती. 15 नोव्हेंबर रोजी मनपा निवडणुकीपूर्वी जेव्हा अजितदादांशी आमची भेट झाली. मी जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते की, दादांनी तेव्हा सांगितले होते की, मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे. तुम्ही कामाला लागा. आपल्याला पुणे मनपा जोमाने लढायची आणि जिंकायची आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत बोलताना दादांनी ही गोष्ट सांगितली. दादानंतर पक्ष मजबूत होण्यासाठी तटकरे यांनी सुद्धा मदत करावी असे ठोंबरे म्हणाल्या.
पक्ष ताब्यात घ्यायचाय?
तटकरे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून निवडीचे पत्र देतानाही दिरंगाई व्हायची असा आरोप ठोंबरे यांनी केला. अजितदादांनी सांगून सु्द्धा कार्यकर्त्यांना डावले जायचे. याची मी साक्षीदार आहे. तटकरे यांच्यासोबत आमचे भांडण नाही. पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. उमेश पाटील यांनी जी फेसबुक पोस्ट केली ती वास्तवतेला धरुन केली आहे. या जुन्या सहकाऱ्यांनी दादांसोबत प्रामाणिकपणे उभे राहायला पाहिजे होते. ते तेव्हा उभे राहिले नाही. आता दादा गेल्यानंतरही ही माणसं पवार कुटुंबियांसोबत उभी राहिली नाही. सुनील तटकरे असतील वा प्रफुल्ल पटेल यांनी दादा गेल्यानंतर पवार कुटुंबियांसोबत खमक्यापणे उभे राहिला पाहिजे होते. सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे होते. मी आरोप करत नाही. मी परिस्थितीजन्य साक्षीदार आहेत. सुनेत्रा वहिनींचे सर्वांनी नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे पक्ष ताब्यात घेण्याची ही लढाई करण्यापेक्षा त्यांनी पवारांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहावे. तुम्ही पवार कुटुंबियांना का त्रास देत आहेत, असा आरोप ठोंबरे यांनी केला. तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावं अशी मागणी त्यांनी केली.
