हेमंत रासने यांच्या मिरवणुकीला टिळक कुटुंबीय, नगरसेवकांची दांडी; हिंदुत्ववादी नेत्याने भाजपला दिला ‘हा’ इशारा

प्रत्येक समाजाचा नेता त्या समाजाचे प्रश्न सुद्धा मांडत असतो. त्यासाठी राखीव मतदारसंघ सुद्धा असतात. हे भारतीय जनता पक्षाला तर माहीत नाहीये का? हे विचारण्याची वेळ आलीय.

हेमंत रासने यांच्या मिरवणुकीला टिळक कुटुंबीय, नगरसेवकांची दांडी; हिंदुत्ववादी नेत्याने भाजपला दिला हा इशारा
kasba peth by election
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 06, 2023 | 2:20 PM

पुणे: कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यावर टिळक कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपने टिळक कुटुंबीय नाराज नसल्याची सारवासारवही केली. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची भेट घेऊन त्यांची नाराजीही दूर केली. मात्र, टिळक कुटुंबीयांनी नाराजी अजून दूर झालेली नाही. टिळक कुटुंबीयच नव्हे तर भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारीही टिळक कुटुंबीयांना डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने नाराज आहेत. हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीला टिळक कुटुंबीय, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने ही नाराजी अधिकच उघड झाली आहे.

हेमंत रासने यांच्या मिरवणुकीला टिळक कुटुंबीय, नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी भाजपवर जोरदार टीका करतानाच इशाराही दिला आहे. आज टिळक कुटुंब, नगरसेवक किंवा पदाधिकारी हेमंत रासने यांच्या मिरवणुकीत गेले नाहीत. ही भारतीय जनता पक्षाला धोक्याची सूचना आहे, असा इशारा आनंद दवे यांनी दिला आहे.

भाजप समाजाला डावलतोय

आनंद दवे स्वत: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीला उभे राहणार आहेत. कसबा मतदारसंघातून हिंदू महासंघाचा उमेदवार म्हणून उद्या मी स्वतः अर्ज भरतोय. ही निवडणूक चुरशीची आणि जिद्दीची सुद्धा आहे.

भाजपची ज्या काळात काही लोक टिंगलटवाळी करत होते, तेव्हा भाजपला वाढवण्यासाठी ज्या समाजाने सर्वाधिक प्रयत्न केले, त्याच समाजाला आज भाजप डावलत आहे. त्या समाजाला भाजप आज वाळीत टाकत आहे, अशी टीका आनंद दवे यांनी केली.

ब्राह्मण समाजाला का डावललं?

कोथरूडचा विषय असो की कसबाचा… पिंपरी चिंचवडमध्ये जगताप कुटुंबीयांना जो न्याय देण्यात आला, तो न्याय टिळकांच्या घराला कसब्यामध्ये का देता आला नाही? असा सवालही त्यांनी केला.

समाजातल्या सर्व जाती, सर्व धर्मीयांना योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, ही हिंदू महासंघाची भूमिका आहे. पुणे जिल्ह्यात 21 आमदार असताना, प्रत्येक समाजाचं चांगलं प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाला का डावललं गेलं? असा सवाल त्यांनी केला.

म्हणून निवडणूक रिंगणात उतरलोय

प्रत्येक समाजाचा नेता त्या समाजाचे प्रश्न सुद्धा मांडत असतो. त्यासाठी राखीव मतदारसंघ सुद्धा असतात. हे भारतीय जनता पक्षाला तर माहीत नाहीये का? हे विचारण्याची वेळ आलीय. त्यामुळे मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार केलेला आहे. आम्ही उद्या फॉर्म भरतोय. हिंदू महासंघाचा उमेदवार निवडून येईल याची खात्री आहे, असं आम्हाला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.

मुळीक टिळकांच्या घरी

दरम्यान, शैलेश टिळक हे रासने यांचा एबी फॉर्म भरताना गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक तातडीने टिळक वाड्यात पोहोचले. मुळीक यांनी टिळक यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.