Boulders fall : पुणे-पानशेत मार्गावर कोसळली दरड, रस्त्यावर दगडांचा खच; 30 गावांचा संपर्क तुटला

| Updated on: Jul 16, 2022 | 3:33 PM

अवैध बांधकामांचा हा फटका असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर दरड पडल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे.

Boulders fall : पुणे-पानशेत मार्गावर कोसळली दरड, रस्त्यावर दगडांचा खच; 30 गावांचा संपर्क तुटला
पुणे-पानशेत मार्गावर दरड कोसळल्यानं रस्त्यावर आलेले दगड
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे-पानशेत रस्त्यावर दरड कोसळली (Boulders fall) आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे एकूण 30 गावांचा संपर्क तुटला आहे. डोंगर उतारावरील संरक्षक भिंत कोसळून दगडं रस्त्यावर आली आहेत. संरक्षक भिंत आणि दरड कोसळल्यामुळे त्याचा फटका वाहतुकीला (Traffic) बसला आहे. ओसाडे आणि सोनपूर या गावांच्या सीमेवरील डोंगर उतारावर ही दरड कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Departments) सध्या दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाट रस्त्याच्या परिसरात दरडींचा धोका अधिक दिसून येत आहे. नागरिकांनी अशा ठिकाणांहून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अवैध बांधकामांचा फटका

अवैध बांधकामांचा हा फटका असल्याचे बोलले जात आहे. यामुळे रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर दरड पडल्याने वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. तिकडे भोर तालुक्यातील घाटमाथ्यावर गेल्या आठवडा भरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दरडी कोसळण्याच्या, रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दरडींचा धोका वाढला

माळशेज घाट परिसरात पावसाची संततधार असल्याने न्याहडी पुलाच्या बाजूला काल दरड कोसळली होती. कल्याण-नगर महामार्ग त्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या आठवडाभरापासून माळशेज घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यातच दरडी कोसळत असून प्रशासनाकडून या दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वंरध घाटही अत्यंत धोकादायक झाला असून मोठमोठे दगड रस्त्यावर येत आहेत.