मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा वाद? सुप्रिया सुळेंनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य तर दिलीप वळसे पाटील म्हणतात…

एकीकडे प्रमुख विरोध पक्ष असलेला भाजपा सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसंवाद नाही, अशी टीका सातत्याने करत आहे. त्यात आता भाजपाला आयताच मुद्दा सापडला आहे.

मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा वाद? सुप्रिया सुळेंनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य तर दिलीप वळसे पाटील म्हणतात...
मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य करताना सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील
Image Credit source: tv9
Pradeep Garad | Updated on: Jun 04, 2022 | 10:29 AM

पुणे : मुख्यमंत्रीपदावरून सध्या राज्यात नवनवीन वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas aghadi government) असून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. अलिकडेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले होते. त्याचा वाद संपत नाही, तोवर आणखी एका राष्ट्रवादीच्याच मंत्र्याने मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीत नेमके काय चालले आहे, ही चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी तुळजापुरात वक्तव्य केले होते, की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण मंत्रीमंडळासह दर्शनाला येणार. तर आता राष्ट्रवादीचेच एक मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केले आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात होणार असे दिसत आहे.

भाजपाला मिळाला आयताच मुद्दा

एकीकडे प्रमुख विरोध पक्ष असलेला भाजपा सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आहे. सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुसंवाद नाही, अशी टीका सातत्याने करत आहे. त्यात आता भाजपाला आयताच मुद्दा सापडला आहे. संख्याबळानुसार शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 तर काँग्रेसकडे 43 जागा आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. मात्र केवळ दोनच जागा शिवसेनेपेक्षा कमी असल्याने राष्ट्रवादीचीदेखील या पदासाठी महत्त्वाकांक्षा आहे आणि ती आता जाहीरही होऊ लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर ही दुसरी वेळ आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

साताऱ्यातील एका कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, की पवार साहेबांनी माझ्यावर विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी दिली होती. पाच वर्ष विरोधीपक्ष नेता म्हणून मी ती जबाबदारी पार पाडली. कितीही मजबूत सरकारी पक्ष असला तरी त्याला गदागदा हलवायचे काम मी केले. आज शब्द देतोय, सामाजिक न्याय व विशेष विभागाचा मंत्री म्हणून… येणाऱ्या काळात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्रीपद द्यायचे कुणाला? जे कुणी मुख्यमंत्री असतील, ते आपलेच असतील…’ असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया ऐका

‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री’

धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की 2024पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. निवडणुकीनंतर जी परिस्थिती समोर येईल, त्यावर तेव्हाच चर्चा करता येईल. प्रत्येक पक्षाने त्याकरिता प्रयत्न करणे काहीही चुकीचे नाही.

Follow Us