कसब्यातून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ‘हे’ नेते शैलेश टिळक यांच्या भेटीला

| Updated on: Feb 06, 2023 | 8:07 PM

शैलेश टिळक किंवा कुणाल यापैकी कोणालाच उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. म्हणून मैत्रीच्या नात्याने आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत, असं संजय मोरे म्हणाले.

कसब्यातून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला; शिवसेनेच्या ठाकरे गटाचे हे नेते शैलेश टिळक यांच्या भेटीला
शैलेश टिळक
Follow us on

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यातील जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर भाजपने पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने उमेदवारी मुक्ता टिळक यांच्या घरात द्यावी अशी मागणी केली जात होती. मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना डावलून रासने यांना उमेदवारी दिली आहे. यावरून टिळकांनी आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली आहे.

नवा ट्विस्ट ठरू शकतो

या भेटीने आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. शैलेश टिळक आज हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील उपस्थित नव्हते. त्यामुळे टिळक नाराज असल्याचे चर्चा सुरु आहेत. अशात ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेली भेट हा कसबा पोटनिवडणूक नवा ट्विस्ट ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा

या भेटीनंतर मनसेचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक या 2019 साली सेना-भाजप युतीत निवडून आल्या होत्या. आता मुक्ता ताईंच्या निधनानंतर त्यांच्या घरात उमेदवारी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती.

मैत्रीच्या नात्याने भेट

त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहेत. पण शैलेश टिळक किंवा कुणाल यापैकी कोणालाच उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. म्हणून मैत्रीच्या नात्याने आम्ही त्यांना भेटायला आलो आहोत, असं संजय मोरे म्हणाले.

मुक्ता टिळक शैलेश टिळक म्हणाले, नाराजी अजीबात नाही. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्टींकडे योग्य त्या पद्धतीने मांडली आहे. काही वैयक्तिक कारण असतात. या दुःखातून बाहेर यायला वेळ लागेल.

पत्नी गेल्याच्या दुःखातून सावरायला वेळ लागेल

घरात उमेदवारी दिली नाही म्हणून अजीबात नाराज नाही. पक्षाचा निर्णय आधीच मान्य केलेला आहे. पक्षाबरोबर राहणार हेही पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे. पत्नी गेल्याच्या दुःखातून सावरायला वेळ लागेल, असं शैलेश टिळक यांनी सांगितलं.

उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली होती. पण, पक्षाने निर्णय घेतला त्यामागे काहीतरी कारणं असतील. पक्षाचा निर्णय मान्य असल्याचं सांगितलं होतं. पक्ष जे काही सांगेल त्याप्रमाणे काम करत राहू, असं मत शैलेश टिळक यांनी व्यक्त केलं.