संभाजीराजे जंटलमॅन, ते बोलणार नाहीत, पण कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो: उदयनराजे

| Updated on: Jun 14, 2021 | 2:25 PM

उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या कोल्हापुरातील मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.

संभाजीराजे जंटलमॅन, ते बोलणार नाहीत, पण कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो: उदयनराजे
उदयनराजे भोसले, भाजप खासदार
Follow us on

पुणे: मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून श्वेतपत्रिका काढली पाहिजे. तेव्हा कोणी कोणाला फूस लावली हे लोकांना स्पष्टपणे समजेल. आधी राज्याने मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे आणि कायदा करावा. त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो. संभाजीराजे यावर थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले. (BJP MP Udyanraje Bhosale on Maratha Reservation)

ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली. यानंतर दोघांनीही प्रसारमाध्यमांशी एकत्रितपणे संवाद साधला. यावेळी उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या कोल्हापुरातील मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना लिहून आता अनेक वर्षे उलटली आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. मग तसे असेल तर कायद्यात सुधारणा या झाल्याच पाहिजेत. बाकीच्यांना आरक्षण मिळालं, तसं मराठ्यांना मिळायला हवं.. लोकसंख्येच्या हिशेबाने देणार असेल तर कॅल्क्युलेशन करा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

मोदींनी भेट म्हणून टाळली असेल: संभाजीराजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा इच्छा व्यक्त केली तेव्हा एक ते दीड दिवसांमध्ये मला भेट दिली. फक्त मराठा आरक्षणाबाबत तांत्रिक बाबींमुळे कदाचित त्यांची अडचण झाली असेल. त्यामुळे त्यांनी यावेळी भेट टाळली असावी, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

ती वेळ येऊ देऊ नका

23 मार्च 1994 ला जीआर काढून आरक्षण देता, ते रद्द करु नका. मग जीआर काढून मराठ्यांनाही आरक्षण द्या. आम्ही जातपात पाहिली नाही. पण आज जाणवत आहे, बोलताना मित्र अंतर ठेवत आहेत. ही दुफळी राज्यकर्त्यांनी निर्माण केली. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर समाजाशाठी एकत्र यावं. संभाजीराजे किंवा मी दुफळी निर्माण केली नाही. द्यायचं असतं तर मागेच दिलं असतं, यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झालेत. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल..अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

उद्रेक झाला तर जबाबदार कोण?, कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

मोठी बातमी : संभाजीराजे आणि उदयनराजेंची पुण्यात भेट, मराठा आरक्षणासाठी दोन्ही राजे एकत्र

(BJP MP Udayanraje Bhosaleon Maratha Reservation)