अजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही- राज ठाकरे
पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात 13 मे ला मतदान होणार आहे. पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पुणे शहराच्या विकासाबाबत बोलताना जातीपातीच्या राजकारणावरूना शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. हे जातीपातीचं विष 1999 सालापासून कालवायला सुरूवात झाली आहे. माझे अजित पवारांबद्दल अनेक मतभेद असतील. पण अजित पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडल गेला होता. अनेकांना वाटलं नितीन गडकरी यांचे नातेवाईक आहेत. त्यानंतर जेम्स लेन हे प्रकरण आणलं गेल्याचं राज ठाकरे म्हणाले.
हे विष तोपर्यंत कालवलं गेलं होतं. काही माहिती नाही कशाचा काही संबंध नाही. का विष कालवलं गेलं कारण तुम्ही जातीकडे पाहावं आणि मतदान करत रहावं. कशाला लागतंय तुम्हाला चांगलं शहर. आम्हाला शहर बरबाद झालं तरी चालेल मात्र जातीवरून काही बोललं तर पेटतो. काहीच कारण नाही, याच मानसिकतेचा गैरफायदा घेणारी मंडळी तुमच्या समोर येत असल्याचं म्हणत ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावं असं सांगत आहेत. अनेक मुसलमान सुज्ञ आहेत त्यांना समजतं कोणाला मतदान करायचं, बाहेर काय वातावरण आहे. मशिदींमधील मौलादी फतवे काढत असतील यांना मतदान करा तर मी आज फतवा काढतो महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करा. याआधीच्या दहा वर्षांआधी त्यांना डोकवर करता आलं नाही म्हणून ही चुळबूळ सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले.