BREAKING | शरद पवार स्पष्टच बोलले, ‘या नेत्याची निवड माझी चूक ठरली’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे, त्यांनी एका नेत्याला देण्यात आलेल्या संधीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित नेत्याला आपण संधी देण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असं शरद स्पष्टपणे म्हणाले आहेत.

BREAKING | शरद पवार स्पष्टच बोलले, या नेत्याची निवड माझी चूक ठरली
Ajit pawar and Sharad Pawar
| Updated on: Jun 27, 2023 | 7:44 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला पंढरपुराच मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनी आज बीआरएस पक्षात प्रवेश केला. भगीरथ भालके यांच्या पंढरपूर तालुक्यातील सरकुली गावात बीआरएस पक्षाचा आज भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव स्वत: आले होते. तसेच तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला आलं होतं. तेलंगणाहून जवळपास 500 ते 600 गाड्यांचा ताफा या कार्यक्रमाला आला होता. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं.

भगीरथ भालके यांच्या बीआरएस पक्षप्रवेशाच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. अखेर त्यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भगीरथ भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की, आमची ही निवड चुकीची होती. त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली.

शरद पवार यांनी यावेळी बीआरएस पक्षावरही टीका केली. “शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री इथे आले. ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. त्यावर हरकत घ्यायचं काही कारण नाही. पण विठ्ठलाची पूजा आणि दर्शन घेण्याचं कारण सांगत जे काही जबरदस्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न शेकडो गाड्या आणि बाकीच्या इतर गोष्टी घेऊन करण्यात आला हे चिंताग्रस्त आणि वादग्रस्त आहे”, असं शरद पवार थेट म्हणाले.

राष्ट्रवादीच्या गोटात काल अचानक घडामोडी वाढलेल्या

भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात काल अचानक राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडी वाढल्या होत्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांपासून इतर नेते सतर्क झाले होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भगीरथ भालके यांच्यासोबत न जाण्याबरोबर चर्चा झाली. तसेच भगीरथ भालके यांच्याबरोबर कुणी जाणार नाही. ते एकटे बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता.

दरम्यान, भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके यांचं कोरोना काळात निधन झालं होतं. त्यानंतर पंढरपुरात पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या पराभवामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Follow Us