“बीआरएस-वंचित बहुजन आघाडीचा राजकीय प्रवेश त्रासदायक”; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं मोठं विधान

| Updated on: Jun 28, 2023 | 4:35 PM

बीआरएस पक्षाच्या सभेवरूनही सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बीआरएस किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे येणारी मते ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या मतदारांचा कौल असतो, मात्र या मतामध्ये आताा फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीआरएस-वंचित बहुजन आघाडीचा राजकीय प्रवेश त्रासदायक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं मोठं विधान
Follow us on

बारामती : राज्यात आणि केंद्रामध्ये ज्यावेळे पासून भाजप सत्तेत आले आहे, तेव्हापासून समान नागरी कायद्यावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अगदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समान नागरी कायद्याबाबत अनेक वेळा मतं व्यक्त केली गेली आहेत. त्यावरूनच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी समान नागरी कायद्याबाबत बोलताना आपण याविषयी मत न मांडता त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हेच त्याविषयी बोलतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.
समान नागरी कायद्याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका शरद पवार आणि अजित पवार मांडतील.

तसेच सरकार आल्यानंतर नवनवी धोरण राबविले जातात, त्याच प्रमाणे समान नागरी कायद्याबाबतही भाजप आपले धोरण राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

संविधानाची अंमलबजावणी

भाजपने 370 सारखं कलम हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तसेच अजूनही काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. भाजपच्या धोरणाबाबत विरोध आणि मत मतांतरे असली तरी आमची एकच भूमिका आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात जे लिहिलं आहे. त्या संविधानाची त्यांच्याकडून अंमलबजावणी केली जावी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पक्षाची आव्हानात्मक स्थिती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पद बदलण्याबाबत बोलतानाही त्यांनी सांगितले की, अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा कणा आहेत. तसेच संबंध महाराष्ट्रात गेल्या पंचवीस वर्षात पक्ष उभारणीत अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. त्याच बरोबर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी भावना व्यक्त केली आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय मात्र पक्षश्रेष्ठीच घेतील असेही त्यांनी म्हटले आहे. उद्याच्या राजकारणात पक्षाची आव्हानात्मक स्थितीत होणारी वाटचाल, आणि त्याबाबतची त्यांची भावना त्यांनी स्पष्टपणे मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मतामध्ये आताा फूट

तर दुसरीकडे बीआरएस पक्षाच्या सभेवरूनही सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बीआरएस किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे येणारी मते ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या मतदारांचा कौल असतो, मात्र या मतामध्ये आताा फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतीय जनता पार्टीला पडणारी मते ठरलेली असतात. तसेच धर्मनिरपेक्ष विचारांची मते ही ठरलेली असतात. त्यामुळे बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडी या शक्तींचा महाराष्ट्रातल्या होत असलेला प्रवेश त्रासदायक असल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचे ध्रुवीकरण

2019 च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत झाले आहेत. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत त्या गोष्टीचा कोणताही परिणाम झाला नाही. पण नवीन शक्ती नवीन ध्रुवीकरण ज्यावेळी होईल त्यावेळी मात्र त्याचा परिणाम धर्मनिरपेक्ष मतांच्या ध्रुवीकरणांमध्ये होऊ शकतो. मात्र महाविकास आघाडी आणि घटक पक्ष याबाबत विचार करतील असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

भाजपाला मदत करणं

तसेच मागील काळात झालेल्या निवडणुकीविवषयी बोलताना ते म्हणाले की, 2019 मध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी जर काढली तर माझ्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला लक्षणीय मत मिळाली होती. ते उमेदवार उभे राहिले नसते तर माझं मताधिक्य लाखापेक्षा जास्त मतांनी वाढले असते. आज धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांमध्ये विभाजन होणे म्हणजे भाजपाला मदत करणं हे सरळ सूत्र असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.