Purandar Sharad Pawar : इतिहासाचं वास्तव चित्रण तरुणांसमोर मांडण्याची गरज; पुरंदर किल्ला भेटीनंतर शरद पवारांनी व्यक्त केली गरज

इतिहासातील सिलेक्टेड भाग घेऊन त्याच्यातून वेगळी भावना मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीला यंत्रणा असण्यापेक्षा जागरूक नागरिक आणि लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी गरज शरद पवार यांनी व्यक्त केली.

Purandar Sharad Pawar : इतिहासाचं वास्तव चित्रण तरुणांसमोर मांडण्याची गरज; पुरंदर किल्ला भेटीनंतर शरद पवारांनी व्यक्त केली गरज
पुरंदर किल्लाभेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 1:27 PM

पुरंदर, पुणे : शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे या देशातील लोकांचे प्रेरणास्थान आहेत. कुठल्याही संकटाच्या काळात धैर्याने तोंड द्यायचे असेल तर कोणाचा तरी राजाश्रय लागतो. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे सर्वोच्च होते. त्यांच्यानंतर संभाजी महाराज संकटांपुढे धैर्याने उभे राहिले. त्यामुळे वास्तव चित्र तरुणांसमोर उभे करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. पुरंदर किल्ल्याला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की प्रत्येक किल्ल्याला इतिहास आहे. परंतु तो योग्य इतिहास योग्य पद्धतीने मांडला पाहिजे. दुर्दैवाने इतिहासाचे ध्रुवीकरण (Polarization) करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य लोकांची ऐतिहासिक भावना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

‘सिलेक्टेड भाग घेऊन त्याच्यातून वेगळी भावना मांडण्याचा प्रयत्न’

अनेकांनी इतिहासाचे वास्तव चित्र मांडले आहे. आ. ह. साळुंखे यांच्यासारख्या व्यक्तींनी वास्तव इतिहास पुढे मांडला आहे. तो वास्तव इतिहास पुढे येईल, याची काळजी घेतली आहे. इतिहासातील सिलेक्टेड भाग घेऊन त्याच्यातून वेगळी भावना मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीला यंत्रणा असण्यापेक्षा जागरूक नागरिक आणि लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी गरज त्यांनी व्यक्त केली. तर सुदैवाने पुरंदर किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. माझ्याकडून राज्य सरकारला विनंती केली जाईल, की इतर किल्ल्याप्रमाणे पुरंदरकडे लक्ष द्यावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘सामान्य माणूस शहाणा’

राज्य घटनेमुळे भारत हा एक संघ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की भारताच्या आजूबाजूच्या देशांत घटना नसल्याने ते देश संकटात गेले. आम्ही राजकारणी लोक, मात्र आमच्यापेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे. त्यामुळे तो योग्यवेळी सत्ता देतो आणि निर्णय चुकला तर सत्ता काढूनदेखील घेतो, असा टोला शरद पवार यांनी भाजपाला लगावला.

‘पुरंदर विमानतळ झाले पाहिजे’

विमानतळ झालेच पाहिजे. परंतु प्रस्तावित जागेला विरोध होत आहे. एका जागेला केंद्र सरकारने प्रतिकुलता दाखवली आहे. त्यावर तोडगा काढला पाहिजे. पुरंदरला जर विमानतळ झाले तर सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्याला फायदा होईल, असे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी महागाई, भाजपा सरकार तसेच राज ठाकरे आणि त्यांना होणार अयोध्या दौऱ्याला विरोध आदी विषयांवर आपले मत मांडले.