
मुंबई, दि. 11 जानेवारी 2024 | एकीकडे तलाठी भरतीचा महाघोटाळा चर्चेत आहे. त्याचवेळी बुधवारी पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला. सारथी, बार्टी, महाज्योतीतर्फे आयोजित या परीक्षेत पुन्हा घोळ झाला. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा गलथान कारभार समोर आला. पुणे येथील वडगावमध्ये असलेल्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर झेरॉक्स प्रत देण्यात आल्या तसेच प्रश्न पत्रिकेतील सी आणि डी प्रश्न पत्रिकेला सील नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? या शब्दात घणाघात केला आहे.
रोहित पवार यांनी पी.एचडी फेलोशिपसाठी पेपर फुटल्यासंदर्भात जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचाही पेपर फुटला. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा, ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी त्यांनी पुढे म्हटले की, वारंवार होणाऱ्या पेपरफुटी मुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं पेपरफुटीवर कडक कायदा करा. युवकांनी ही मागणी किती वेळा करायची? युवकांना जेव्हा तुम्ही सिरीयस होण्याचा सल्ला देतात तेव्हा आपल्या जबाबदारीबाबत आपण सिरीयस होणार की नाही?
रोहित पवार यांनी तलाठी भरती आणि सर्व भरतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. भाजप सरकारमध्ये हेच सुरू आहे. कोणी लक्ष देत नाही. हा मुद्दा मुलांनीच पुढे आणला आहे. या प्रकरणी आम्ही चौकशीची मागणी करत आहोत. परंतु विखे पाटील यांनी आमच्यावर काही कारवाई करायची असेल तर करा, असे आव्हान त्यांनी दिले.
नागपूर, पुणे, संभाजीनगर या केंद्रावर पीएचडी फेलोशिप पेपर फुटीचा प्रकरण समोर आला आहे. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने नागपूरमध्ये आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले. त्यामुळे अभविपने सक्करदरा पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
हे ही वाचा
रोहित पवार म्हणाले, तलाठी भरतीसाठी एका जागेसाठी २५ लाख, राधाकृष्ण विखे यांचा पलटवार