रोहित पवार म्हणाले, तलाठी भरतीसाठी एका जागेसाठी २५ लाख, राधाकृष्ण विखे यांचा पलटवार
तलाठी भरती परीक्षेवरुन आमदार रोहित पवार यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

कुणाल जायकर, अहमदनगर, दि. 11 जानेवारी 2024 | तलाठी भरतीवरून सध्या राज्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचा पाहायला मिळत आहे. तलाठी भरती वरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. एकेका जागेसाठी 25 लाखांहून अधिकची वसुली झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याला महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी पलटवार करत उत्तर दिले आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने झाली आहे, जर कोणी अशा पद्धतीने सरकारची बदनामी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा त्यांनी दिला होता.
रोहित पवार यांनी राधाकृष्ण विखे यांच्यात जुंपली
विरोधकांनी तलाठी भरतीच्या परीक्षेत घोळ झाला आहे. ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. विखे पाटलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तलाठी भरती बाबत बेछूट आरोप केले जात आहे. जी मुलं गुणवत्ता यादीत आली त्यांच्यावर अन्याय का करायचा?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या परीक्षेत कुठलाही गैरप्रकार झाला नाही. विनाकारण गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोटा प्रचार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले. रोहित पवार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी दिले उत्तर
आमदार रोहित पवार यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण ते देणार का? आणि कुणालाही डॉक्टर करणार का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. सरकार विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहे. विद्यार्थ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आलेली आहे. सरकार मधले मंत्रीचं असे वागत असतील तर न्याय कुणाकडून मागायचा?, असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.त्याचबरोबर शिक्षक भरतीवरून देखील त्यांनी सरकारला घेरले आहे. तलाठी भरतीवरून सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.
