तुकाराम मुंढेंनी लावलेल्या शिस्तीला तिलांजली देणं पीएमपीला महागात!

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लावलेल्या शिस्तीला तिलांजली देणं पीएमपीला आता महागात पडतंय. पुणे शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीचा तोटा गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवसाला 14 लाखांपर्यंत वाढून तो 70 लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे तोटा होत असतानाच उत्पन्नही दहा लाखांनी कमी झालंय. तत्कालीन अध्यक्ष […]

तुकाराम मुंढेंनी लावलेल्या शिस्तीला तिलांजली देणं पीएमपीला महागात!
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लावलेल्या शिस्तीला तिलांजली देणं पीएमपीला आता महागात पडतंय. पुणे शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीचा तोटा गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवसाला 14 लाखांपर्यंत वाढून तो 70 लाखांवर गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकीकडे तोटा होत असतानाच उत्पन्नही दहा लाखांनी कमी झालंय. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी लावून दिलेल्या शिस्तीला तिलांजली दिल्यामुळे आज पीएमपी तोट्यात गेल्याचा आरोप केला जात आहे.

पुण्याची जीवनवाहिनी समजली जाणारी पीएमपी आज तोट्यात चालू आहे. पीएमपीने रोज 10 लाख प्रवासी प्रवास करतात, तरीही पीएमपी तोट्यात कशी असा प्रश्न पडलाय. मात्र पीएमपीच्या निष्क्रिय कारभारामुळे उत्पन्न कमी आणि तोटा जास्त असेच चित्र अलीकडच्या काही वर्षांत पुढे आलं आहे.

तोटा वाढला, उत्पन्नही घटलं

यासंदर्भात पीएमपीला मिळणारे उत्पन्न, खर्च आणि होत असलेला तोटा यासंदर्भात नगरसेवक आबा बागुल यांनी महापालिकेच्या मुख्य सभेच्या प्रश्नोत्तराद्वारे लेखी विचारणा केली होती. त्यावर पीएमपीने दिलेल्या उत्तरातून ही बाब स्पष्ट झाली. सन 2017-18 या वर्षांत दिवसाला 1 कोटी 78 लाख रुपयांचं उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होत होतं. तर दिवसाचा खर्च हा 2 कोटी 34 लाख रुपये होत होता. त्यावेळी तोट्याचे प्रमाण हे 56 लाख रुपये असे होते.

सन 2018-19 या वर्षांतील एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यात पीएमपीचे दिवसाचं उत्पन्न 1 कोटी 68 लाख रुपये आहे. दिवसाचा खर्च 2 कोटी 38 लाख रुपये आहे. तर दिवसाला होणारा तोटा 70 लाख रुपये आहे. गेल्यावर्षी दिवसाला होणारा तोटा 56 लाख रुपये होता, तो 14 लाखांनी वाढून 70 लाखांवर पोहोचला आहे.

पीएमपी प्रशासनाचं म्हणणं काय?

पीएमपी तोट्यात जाण्यामागे प्रशासनच असल्याचं काही सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नव्या गाड्यांच्या खरेदीला झालेला विलंब, जुन्या आणि आयुर्मान संपलेल्या गाड्यांवरील दुरुस्तीचा वाढलेला खर्च, नादुरुस्त गाड्यांमुळे संचलनात येत असलेले अडथळे, इंधन दरवाढ आणि आस्थापनेवरील खर्च यामुळे तोटा होत असल्याचा दावा पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

गतवर्षीपेक्षा उत्पन्न 10 लाखांनी कमी झालं असून खर्चामध्ये दिवसाला चार लाखांची वाढ झाली आहे. तुकाराम मुंढे पीएमपीचे अध्यक्ष असताना त्यांनी जी शिस्त लावली, त्यामुळे ते अनेकांच्या निशाण्यावर आले. त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. पारदर्शकता आणि प्रवाशांची सुविधा हाच त्यांचा अजेंडा होता. पण त्यांनी लावलेल्या शिस्तीला तिलांजली दिल्यामुळे पीएमपी आज कोणत्या अवस्थेत आहे, ते आकडेवारीतून समोर आलंय.

Follow Us