Pune Asim Sarode : विकासाच्या आड येणारी धर्मांधता आपल्या काहीही कामाची नाही; मंदिर-मशिद वादावर पुण्यात असीम सरोदे यांचं मत

देशात अनेकठिकाणी मंदिर आणि मशीद जवळजवळ आहेत. त्यात आतापर्यंत कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र आता जे होत आहे, ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे असीम सरोदे म्हणाले आहेत.

Pune Asim Sarode : विकासाच्या आड येणारी धर्मांधता आपल्या काहीही कामाची नाही; मंदिर-मशिद वादावर पुण्यात असीम सरोदे यांचं मत
देशातील धार्मिक स्थळांच्या वादावर भाष्य करताना अॅड. असीम सरोदे
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 25, 2022 | 4:24 PM

पुणे : ज्ञानवापी मस्जिद प्रकरणामुळं अनेक मंदिर-मस्जिद-चर्च इत्यादींचा वाद भारतात निर्माण होऊ शकतो, अशी भीती कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने यावरून देशात धार्मिक दंगली (Riot) होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की प्रार्थनस्थळाचे संरक्षण कायदा 1991ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आता न्यायालयावर आहे. 1991च्या कायद्याची घटनात्मकता जरूर तपासली जाईल, पण आता निर्णय शांततेसाठी घ्यावा लागेल. ज्ञानवापीप्रकरणी हिंदू आणि मुस्लीम लोक काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. मंदिर-मस्जिदीबाबत विशिष्ट हिंदुत्ववादी किंवा मुस्लीमवादी लोकांच्या आहारी जाणे न्यायालयाने (Court) टाळावे, असे मत असीम सरोदे यांनी मांडले आहे.

‘धर्मांध लोक सत्तेत होते तेव्हा…’

मंदिर-मशिदींचा वाद हा देशासाठी काही नवा नाही. जेव्हा धर्मांध लोक सत्तेत होते तेव्हा क्षेत्रफळ वाढवण्यासाठी राज्यविस्तार केला जात होता. त्यासाठी युद्ध होत असे. त्यात जो राजा जिंकेल त्याचा जो धर्म असेल तो स्वीकारला जायचा. तर जे स्वीकारणार नाहीत, ते आपापल्या धार्मिक स्थळी जात होते. तो प्रघात पाळला जायचा. देशात अनेक ठिकाणी तो प्रकार पाहायला मिळाला. मग मंदिरांच्या जागी मशिदी तसेच चर्च उभे राहिलेले आपण पाहिले आहे. गोव्यात पोर्तुगीजांनी मंदिर, मशिदी पाडून चर्च उभ्या केल्या. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, असे ते म्हणाले.

काय म्हणाले असीम सरोदे?

‘संतुलितपणे पाहता यावे’

संतुलितपणे अशा मुद्द्यांकडे आपल्याला पाहता यायला हवे. भारतीय नागरिक म्हणून आपण समजून घेतले पाहिजे की धर्मांधता आपल्या काहीही कामाची नाही. ती विकासाला अडसरच ठरते. देशात अनेकठिकाणी मंदिर आणि मशीद जवळजवळ आहेत. त्यात आतापर्यंत कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र आता जे होत आहे, ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सरोदे म्हणाले. ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील वादावर त्यांनी भाष्य करत हा वाद सामंजस्याने मिटवण्याची अपेक्षा त्यांनी केली आहे.