
पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात दोन अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. भोर तालुक्यात शेतात काम करताना यंत्रात स्कार्फ अडकल्याने एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे शहरातील कात्रज भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डंपरने एका दुचाकीस्वार महिलेचा जीव घेतला. या दोन्ही घटनांमुळे संबंधित परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील भोर तालुक्यातील कुरुंगवडी येथील शुभांगी निलेश राऊत (४१) या शनिवारी सकाळी आपल्या शेतात मसूर आणि वाटाणा मळणीचे काम करत होत्या. ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणीयंत्राच्या (थ्रेशर) साहाय्याने धान्य भरडण्याचे काम जोरात सुरू होते. सकाळी ११ च्या सुमारास काम करत असताना शुभांगी काही कारणास्तव मशीनजवळ वाकल्या. त्याच क्षणी त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि त्यांचे केस सुरू असलेल्या मशीनमध्ये ओढले गेले.
या मशीनचा वेग इतका प्रचंड होता की क्षणात त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच जवळच असलेले नातेवाईक जयेंद्र सुरेश राऊत, संतोष शिळीमकर आणि ट्रॅक्टर चालक जगन्नाथ कांटे यांनी धाव घेत मशीनमधून त्यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शनिवारी त्यांचा वाढदिवस होता, मात्र ऐन वाढदिवशीच त्यांना मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, पुणे-सातारा रस्त्यावरील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर शुक्रवारी सकाळी 8.45 च्या सुमारास भीषण अपघात झाला. परिमा हेमंत प्रधान (३८) या आपल्या दुचाकीवरून कामावर जात असताना एका भरधाव डंपरने (MH-42-AQ-3004) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत परिमा यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी डंपर चालक संजय प्रभाकर जाधव (२८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरातील जड वाहनांच्या वावरावरुन पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही डंपर, सिमेंट मिक्सर आणि ट्रक सतत धावत असतात. सकाळी कामावर जाणाऱ्यांची वर्दळ असताना ही वाहने नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. यावेळी प्रशासनाचे नियम केवळ कागदावरच राहिल्याने सर्वसामान्य पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.