पुणे शहराच्या पाणी कपातीसंदर्भात काय झाला निर्णय? नियोजनात नेमके ठरले काय?

| Updated on: Apr 26, 2023 | 2:32 PM

Pune city water supply : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा वेगाने कमी होत आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. यासंदर्भात बुधवारी कालवा समितीची बैठक झाली. त्यात महत्वाचा निर्णय झाला.

पुणे शहराच्या पाणी कपातीसंदर्भात काय झाला निर्णय? नियोजनात नेमके ठरले काय?
Follow us on

पुणे : पुणे शहरातील नागरिकांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत पाणी कपातीचे संकट पुणेकरांवर असणार आहे. कारण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकल्पाचा साठा घसरला आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा एल निनोमुळे मॉन्सून (Monsoon) लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

काय घेतला निर्णय

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत तुर्त पुणेकरांना दिलासा देणारा निर्णय झाला आहे. पुणेकरांची पाणीकपात 15 मे पर्यंत टळली आहे. 15 मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. कालवा समितीच्या बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा झाली. त्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते म्हणाले, ‘पाणी सोडा म्हणून माझ्यावर दबाव असतो. पण पालकमंत्री म्हणून मला पाणी सोडता येत नाही. त्यासाठी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी, पाणी लागते. पाण्याचे गणित दर चार महिन्यात बदलत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

जलसाठा किती घसरला

पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी २१ धरणांमधील जलसाठा घसरला आहे. हा जलसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात उजनीसह लहान मोठ्या एकूण २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी आहे. यंदा या धरणांमध्ये २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के जलसाठा झाला होता. परंतु पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा शिल्लक आहे.

पाणीपातळीत वेगाने घट 

पुणे जिल्ह्यातील खडकवासला,चासकमान, वीर, डिंभे, विसापूर, उजनी या धरणांतून पाण्याचा डाव्या, उजव्या कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. या विसर्गाचा वापर शेतीसाठी केला जात आहे. याशिवाय खडकवासला, पवना, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर या धरणांतून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे.