Pune MNS : भोंगा भोवतोय..! पुणे शहरातलं लोण ग्रामीणपर्यंत पोहोचलं, दौंडच्या मनसे शहराध्यक्षाचा राजीनामा

| Updated on: May 02, 2022 | 4:52 PM

जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर होते. त्यांनी आता मनसेच्या भोंग्यांच्या राजकारणाविरोधात भूमिका घेतली असून पदाधिकारी राजीनामे देत आहेत.

Pune MNS : भोंगा भोवतोय..! पुणे शहरातलं लोण ग्रामीणपर्यंत पोहोचलं, दौंडच्या मनसे शहराध्यक्षाचा राजीनामा
मनसे दौंड शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी दिला पक्षाचा राजीनामा
Image Credit source: tv9
Follow us on

दौंड, पुणे : औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे, मनसेचे (MNS) राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे, जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर होते. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि भोंग्याचा राजकारणामुळे मनसेमधील मुस्लीम कार्यकर्ते राजीनामा देत असल्याचे यावरून दिसून येत आहे. वाहतूक सेनेचे अध्यक्षपद, पुणे जिल्हा कामगार सेना एसटी महामंडळाच्या सदस्य पदावर होतो, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेनंतर आम्ही नाराज असल्याचे सांगत राजीनामा दिल्याचे सय्यद यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

कालच्या भाषणात राज म्हणाले होते, की आज तारीख 1, उद्या तारीख 2. 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणत्याही प्रकारचे विष कालवायचे नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा पुन्हा राज ठाकरेंनी दिला. तसेच हिंदूंना हातजोडून विनंती आहे. जिथे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट हनुमान चालिसा लागली पाहिजे. विनंती करून ऐकत नसेल तर पर्याय नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. आम्हाला सभा घेतना हा सायलन्स झोन आहे. शाळा आहे, असे सांगितले. रात्री कुठे शाळा असते, असा सवाल करत यांना कुठेही, रस्त्यावर उतरून नमाज पढण्याचा कुणी अधिकार दिला, असा सवालही त्यांनी केला होता.

अजानवेळी दिली चिथावणी

राज ठाकरे बोलत असताना सभेच्या वेळीच अजून सुरू झाली. त्याचाही समाचार राज ठाकरेंनी घेतला आहे. सभेच्या वेळी बांग देत असतील तर त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. आताच्या आता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊन जाऊ देत, आता बोळा कोंबावा. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजी नगर पोलिसांना हात जोडून विनंती आहे, असे म्हणत चिथावणी देणारी भाषा वापरली होती. एवढेच नाही, तर एकत नसतील तर महाराष्ट्रातील मनगटात काय ताकद आहे हे दाखवू. देशवासियांना विनंती मागचा पुढचा विचार करू नका. भोंगे उतरलेच पाहिजे. सर्व धर्मीयांच्या स्थळांवरचे. पहिले मशिद नंतर मंदिर. अभी नही तो कभी नाही, असे राज म्हणाले होते.