पुणेकरांनो सावध व्हा! डेंग्यूसंदर्भात दीड हजार जणांना नोटीसा

| Updated on: Aug 30, 2021 | 5:19 PM

गेल्या काही दिवसांत पुणे शहरात डेंग्यूसोबतच चिकन गुनिया आणि इतर साथीच्या रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळायला सुरूवात झाली आहे. त्यानंतर डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या 1 हजार 661 व्यक्ती आणि संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणेकरांनो सावध व्हा! डेंग्यूसंदर्भात दीड हजार जणांना नोटीसा
डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई महापालिकेची प्रभावी उपाययोजना
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांत पुणे शहरात डेंग्यूसोबतच चिकन गुनिया आणि इतर साथीच्या रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळायला सुरूवात झाली आहे. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरात डेंग्यू आणि इतर साथीच्या रोगांची व्याप्ती वाढू नये यासाठी डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या 1 हजार 661 व्यक्ती आणि संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे.

डासांच्या उत्पत्तीची ठिकाणं तातडीने नष्ट करण्याचे आदेश यांना देण्यात आले आहेत. नोटीसा देऊनही ज्यांनी परिसरातलं पाणी काढलं नाही त्यांना 1 लाख 23 हजार 850 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation has sent notices to one and a half thousand people responsible for the origin of dengue mosquitoes)

चिकुनगुनिया आणि डेंग्यू रोगांच्या रुग्णसंख्येत वाढ

सध्या पुण्यात कोरोनाची लाट आटोक्यात आलेली असताना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चिकुनगुनिया आणि डेंग्यू रोगांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. जानेवारी 2021 पासून एकूण 84 जणांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तर डेंग्यूच्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जानेवारी ते 26 ऑगस्टदरम्यान शहरात 1 हजार 624 जणांना डेंग्यूची लक्षणं आढळली आहेत. यापैकी 203 जणांना प्रत्यक्ष डेंग्यूची लागण झालेली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी 86 रुग्ण आढळून आले आहेत.

डासांच्या उत्पत्तीचं प्रमाण वाढलं

पावसाळ्याच्या दिवसांत डासांची उत्पत्ती होऊन शहरात वेगवेगळ्या साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. इमारतीच्या पार्किंगमध्ये, टेरेसवर, टाक्यांमध्ये, जुन्या टायर, कुंड्या किंवा इतर रिकाम्या जागांमध्ये पाणी साचून डेंग्यूला कारणीभूत असलेल्या डासांच्या उत्पत्तीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास उत्पत्ती करणारी ठिकाणं शोधून ती नष्ट करण्याची कार्यवाही केली जाते. याशिवाय डासांची उत्पत्ती होऊ शकणाऱ्या जागांवर औषध फवारणीही करण्यात येते.

काय काळजी घ्यायला हवी?

पुण्यातल्या खासगी रुग्णालयांमध्ये विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे पाणी साचून राहिल्याने डासांचं प्रजनन होतं आणि यामुळेच हे आजार पसरत असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार घेऊन रुग्ण बरा होऊ शकतो, त्यामुळे ताप आल्यास अंगावर न काढता वेळेवर चाचणी करून घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

पावसाळ्यात पाणी साचल्याने त्यात डासांची उत्पत्ती होते. त्यातून डेंग्यू, चिकन गुनियासारखे आजार बळावतात. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीची ठिकाणं शोधून ती नष्ट करणं गरजेचं आहे.

घराच्या परिसरात, कुंड्या, डबके, टायर, मडके, पाईप किंवा जिथे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे तिथे पाणी साठून राहू देऊ नका. घरातली सगळी भांडी पालथी ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा.

मोठ्या टाक्या, डबके यांमध्ये डासांची उत्पत्ती रोखणाऱ्या औषधांची फवारणी करा. घराच्या परिसरात पाणाी साचू देऊ नका. डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा. घरात वावरतानाही अंगभर कपड्यांचा वापर करा.

वातावरण बदलल्यामुळे लहान मुलांमध्येही व्हायरल फिव्हरचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष सक्ष देणं गरजेचं आहे.

अचानक वाढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळेदुखी ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणं आहेत. यासोबतच कधीकधी डेंग्युमुळे रक्तस्रावही होऊ शकतो. असं झाल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घ्या.

कोरोनाचं सावटही पूर्णपणे गेलेलं नाही. त्यामुळे ताप जाणवल्यास डॉक्टरांना दाखवून आवश्यक चाचण्या करून घ्या.

इतर बातम्या :

जळगावात एकनाथ खडसे भाजपवर बरसले; ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली मनातील खदखद !

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीमार्फत कारवाई, यामागे भाजपची राजकीय सूडबुद्धी; नवाब मलिकांचा आरोप

Video | उंच डोंगरावर कुत्र्याची मस्ती, एका चुकीमुळे मालकाला फुटला घाम, नेमकं काय घडलं ?