Pune rain : मुसळधार पावसानं पुणेकरांना झोडपलं; हवामान विभागानं दिला होता यलो अलर्ट

| Updated on: Jul 27, 2022 | 7:45 PM

मध्यंतरीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात आज पाऊस झाला असला तरी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले.

Pune rain : मुसळधार पावसानं पुणेकरांना झोडपलं; हवामान विभागानं दिला होता यलो अलर्ट
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाचे (Pune rain) पुन्हा आगमन झाले आहे. सायंकाळच्या सुमारास पुण्यात जोरदार पाऊस बरसला. शहरात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान खात्याने (India Meteorological Department) आज पुणे शहरासाठी येलो अलर्ट दिला होता. त्यानुसार पुणेकरांना आज पावसाने भिजवले. शहरातील मध्यवर्ती भाग त्याचबरोबर सिंहगड रोड, बाणेर, बालेवाडी, वारजे, कर्वेनगर, औंध यासह बहुतांश ठिकाणी प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पिंपरी चिंचवड शहराच्या अनेक भागातही मुसळधार (Heavy rain) तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस झाला. तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. हवामान विभागाकडून काही दिवसात राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत आज पावसाचे आगमन झाले.

पुणेकरांची तारांबळ

राज्यात जुलैच्या सुरुवातीला पाऊस सुरू झाला. तो पाऊस महिन्याच्या मध्यापर्यंत जोरदार बरसला. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर तो काही जिल्ह्यांत कमीही झाला. आता पुन्हा पावसाने जोर धरला असल्याचे आजच्या पावसावरून दिसून येत आहे. पुढचे दोन दिवस मुसळधार स्वरुपात पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. एकूण 18 जिल्ह्यांना काल हवामान विभागाने इशारा दिला होता. त्याप्रमाणे पुण्यात अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

मुसळधारेनंतर तीव्रता होणार कमी

पुणे आयएमडी, हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी पावसाविषयीचे अपडेट्स देताना सांगितले, की अरबी समुद्रातील पश्चिमेकडील प्रवाह अंशतः मजबूत झाल्यामुळे पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे पावसाच्या पाण्याने युक्त होणार आहेत. तर 28 जुलैनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. मध्यंतरीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात आज पाऊस झाला असला तरी राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले.