पुणे: जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पामधील चारही धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे जवळपास 94 टक्के भरली आहेत.
सन 2015 पासून आतापर्यंत जून आणि जुलै या पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांचा विचार केल्यास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. पुणे जिल्ह्याला शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. टेमघर धरण परिसरात दोन हजार मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात १५०० मिमी पाऊस झाला. तर खडकवासला धरण परिसरात 450 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यानुसार या चारही धरणांच्या परिसरात यंदा आतापर्यंत सरासरी एवढय़ा पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील खेड व शिरूर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान धरण हे 100 टक्के क्षमतेने भरले आहे.
त्यामुळेच चासकमान धरण पूर्ण भरून वाहायला लागले आहे. चासकमान धरणात पाणी साठवण्याची क्षमता 8.50 टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 25 दिवस आधीच हे धरण भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन धरणाच्या पाचही दरवाजाद्वारे भिमानदी पाञात 925 क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पॉवर हाऊसमधून 550 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून भीमानदी काठावरच्या नागरीकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहराला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला मंजूर केला आहे. महापालिका हद्दीत नव्याने आलेल्या 23 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणामधून 5 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी द्यावे असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल.
पुण्याची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी कोटा वाढवावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून महापालिका करत आहे. महापालिका हद्दीपासून सुमारे 40 किलोमीटर लांब असलेल्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाची मान्यता मिळावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.