दहावी, बारावी परीक्षेत प्रॅक्टिकल गुणांसंदर्भात महत्वाचा बदल

SSC and HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाचा बदल राज्य शिक्षण मंडळाने केला आहे. हा बदल दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षासंदर्भात आहे. आता ही प्रणाली ऑनलाईन केली आहे. त्यामुळे लवकर निकाल लावणे शक्य होणार आहे.

दहावी, बारावी परीक्षेत प्रॅक्टिकल गुणांसंदर्भात महत्वाचा बदल
ssc and hsc board
Jitendra Zavar | Updated on: Jan 17, 2024 | 9:26 AM

पुणे, दि.17 जानेवारी 2024 | दहावी, बारावीची परीक्षा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. या परीक्षेसंदर्भात महत्वाचा बदल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ओएमआर गुणपत्रिकेत पाठवले जात होते. परंतु आता हे गुण बोर्डाच्या संकेतस्थळाबर ऑनलाइन भरावे लागणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार केली आहे. त्यात मेकर आणि चेकरचा समावेश केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य चेकरची भूमिका बजावणार आहेत.

कशी असणार प्रणाली

बोर्डाच्या संकेतस्थळावरुन (www.mahahsscboard.in) गुण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत. त्यासाठी मुख्य लॉगिन आयडीवरुन शाळा, महाविद्यालयाचा अधिकृत ई मेल आणि नियुक्त केलेल्या प्रतिनिधीच्या मोबाइल क्रमांक द्यावा लागणार आहे. शाळेकडून एक किंवा त्यापेक्षा जास्त युजर तयार करणे गरजेचे आहे. यानंतर संबंधित युजर विषयानुसार प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण किंवा श्रेणीची नोंद करणार आहेत. ऑनलाईन एन्ट्री झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य चेकरची भूमिका पार पाडणार आहे.

ऑनलाईन नोंदीनंतर ही पद्धत

शाळेच्या युजरने विषयानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केल्यानंतर ते तपासणीसाठी चेकरकडे पाठवले जाईल. त्यानंतर अंतिम गुण आणि श्रेणी मंडळाला पाठवता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक, ऑनलाइ नोंदविलेल्या गुणांची प्रिंट घेऊन त्यावर अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी, मुख्याध्यापकांची सही आणि शाळेचा शिक्का सीलबंद पाकिटात मंडळाकडे जमा करावा लागणार आहे.

काय होणार फायदा

ऑनलाइन प्रणालीमुळे अंतर्गत गुणांचे काम शाळेच्या पातळीवर अद्यावत होणार आहे. यामुळे मंडळाकडील कामाचा ताण कमी होणार असून निकाल लवकर लावणे शक्य होणार आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक हे सर्व चेक करणार असल्यामुळे चुकांची शक्यता नसणार आहे. काळाप्रमाणे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बदल करत आहे. या अद्यावत प्राणलीमुळे वेळ वाचणार आहे.

Follow Us