पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, शरद पवार पहिल्यांदाच बोलले; पवार यांना काय सूचवाचंय?

माझा एक अनुभव आहे. ऐनवेळी केलेल्या बंडखोरीने काही फरक पडत नाही. चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे.

पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली, शरद पवार पहिल्यांदाच बोलले; पवार यांना काय सूचवाचंय?
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 22, 2023 | 12:32 PM

पुणे : शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता. मी तुम्हाला अर्धीच गोष्ट सांगतो. बाकीची गोष्ट नंतर सांगेल, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली होती. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांनी बंड केलं होतं का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली होती. तर शरद पवार यांनी या विषयावर मौन बाळगल्याने फडणवीस यांच्या दाव्याला बळ मिळत होते. मात्र, अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावर मौन सोडलं आहे. पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार यांनी सूचक विधान केल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

शरद पवार पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पहाटेच्या शपथविधीतून सरकार बनविण्याचा प्रयत्न झाला खरा. पण त्यातून एक फायदा झाला. तो म्हणजे राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली, असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी अत्यंत तोलून मापून आणि सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आता नाना तर्कवितर्क लढवले जात आहेत. पवार यांना नेमकं काय सूचवायचं आहे? या शपथविधीमागे पवारच आहेत काय? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.

काही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव…

राज्यातील प्रत्येक गोष्टीला शरद पवार यांनाच जबाबदार धरलं जातं. त्यावरही त्यांना विचारण्यात आलं असता पवारांनी मिश्किल उत्तर दिलं. महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्ये आहे. काही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव येतं. मग राजकारणात भूकंप झाला तरी तेच नाव येतं, असा चिमटा पवार यांनी काढला.

बंडखोरीने फरक पडत नाही

यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीतील राहुल कलाटे यांच्या बंडखोरीवरही भाष्य केलं. माझा एक अनुभव आहे. ऐनवेळी केलेल्या बंडखोरीने काही फरक पडत नाही. चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे, असं सांगतानाच प्रत्येक व्यक्तीला निर्णय घेण्याचा अदिकार आहे. त्यामुळे वंचितची सभा होत असेल, असंही ते म्हणाले.

गर्दीने निवडणूक जिंकता येत नाही

भाजपला इथं सहानुभूती मिळू शकते. हे नाकारता येत नाही. परंतु, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. नेत्यांच्या गर्दीने निवडणूक जिंकता येते असं नाही (भाजप च्या नेत्यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे, त्यावरून पवारांनी टोला लगावला ) निवडणुकीत देशातील कानाकोपऱ्यातील नेत्यांना आणून गर्दी करायची हे भाजपचे कामच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

देशात असं कधी घडलं नव्हतं

यावेळी निवडणूक आयोगाचा निर्णय आणि शिवसेना यावरही त्यांनी भाष्य केलं. राजकारणात संघर्ष असतो. मात्र, सत्तेचा गैरवापर करून अधिकार हिसकावून घेणं हे या देशात कधीच घडलं नव्हतं. इथं पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देण्याचं काम निवडणूक आयोगाने केलं आहे.

देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतं की यांच्या पाठी कोणी आहे हे पाहावं लागेल, असं सांगतानाच पण कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. हे पुढील निवडणुकीत दिसून येईल, असं ते म्हणाले.