शरद पवार यांनी संभाजी भिडे यांची थेट लायकीच काढली, पाहा नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला. संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांचं नाव घेत निशाणादेखील साधला.

शरद पवार यांनी संभाजी भिडे यांची थेट लायकीच काढली, पाहा नेमकं काय म्हणाले?
संभाजी भिडे आणि शरद पवार
Chetan Patil | Updated on: Aug 19, 2024 | 4:10 PM

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत मांडलेल्या भूमिकेवर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. संभाजी भिडे यांच्या मते मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. त्यांनी अप्रत्यक्षपणे तशीच भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील अनेक नेतेमंडळींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे वारंवार उपोषणाला बसत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या रॅली काढत आहेत. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आग्रही आहेत. विशेष म्हणजे संभाजी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. असं असताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका बदलल्याची चर्चा आहे. संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांनी खोचक टीका करत फार बोलणं टाळलं.

“संभाजी भिडे हे काय कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का? काहीही प्रश्न विचारतात. म्हणून तुम्हाला भेटायचं नाही म्हणतो. हल्ली कसेही प्रश्न तुम्ही विचारता, आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक…”, असं म्हणत शरद पवार यांनी त्यावर फार प्रतिक्रिया देणं टाळलं.

आधी आरक्षणाची ग्वाही आणि आता….

मराठा आरक्षणासाठी स्वतः ग्वाही देणाऱ्या संभाजी भिडेंनी आता मात्र त्यावरुन पलटी मारली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी अंतरवाली सराटीत जावून आरक्षण मिळेल, सत्तेतील एकनाथ शिंदे-फडणवीस आणि
अजित पवार हा प्रश्न सोडवतील, असा विश्वास संभाजी भिडेंनी व्यक्त केला होता. मात्र त्यांच्या याच वक्तव्यापासून त्यांनी पलटी मारली आहे. त्यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिकाच बदलली आहे. मराठ्यांनी देश चालवायचा, आरक्षण कुठून काढलंय? असं आता संभाजी भिडे म्हणत आहेत.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

“मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे”, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us