सत्यजित तांबे यांना तिकीट मिळण्यासाठी शरद पवार यांनी कुणाला केला होता फोन?; अजित पवार यांचा गौप्यस्फोट काय?

| Updated on: Feb 03, 2023 | 12:18 PM

सत्यजितला उमेदवारी दया असं स्वत: शरद पवार साहेबांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली.

सत्यजित तांबे यांना तिकीट मिळण्यासाठी शरद पवार यांनी कुणाला केला होता फोन?; अजित पवार यांचा गौप्यस्फोट काय?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. तांबे यांनी बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. त्यांनी अपक्ष अर्ज भरल्याने काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबितही केलं होतं. परंतु, सत्यजित तांबेंना तिकीट मिळावं म्हणून पडद्यामागून अनेक हालचाली झाल्या होत्या. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही मैदानात उतरले होते. शरद पवार यांनी सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केला होता. तसा गौप्यस्फोटच राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

सत्यजितला उमेदवारी दया असं स्वत: शरद पवार साहेबांनी मल्लिकार्जुन खरगेंना फोन करून सांगितलं होतं. पण त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली आणि तिथंच गडबड झाली. आताही काँग्रेसनं फार ताणून धरू नये. सत्यजितला पुन्हा सोबत घ्यावं असं मला वाटतं. पण अंतिम निर्णय हा सत्यजितनेच घ्यायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सारखं सारखं…

यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सारखं सारखं भल्या भल्या सकाळी नका म्हणत जाऊ… सकाळी 8 वाजता तो शपथविधी झाला होता. त्यावर मी जास्त बोलणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

निवडणूक होणारच

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जो कुणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. दोन्ही ठिकाणी निवडणूक होणार आहे. अजिबात बिनविरोध निवडणूक होणार नाही, असंही ते म्हणाले.

पत्ते बाहेर काढणार नाही

तुम्ही आम्हाला कधीच उद्याचा अग्रलेख बातमी सांगत नाही. त्यामुळे मी पण आता माझे पत्ते बाहेर काढणार नाही. मला ज्या पद्धतीने काम करायचं त्याच पद्धतीने काम करणार, असंही ते म्हणाले.

आताचे कारभारी किती बैठका घेतात?

मी सत्तेत असताना प्रत्येक प्रकल्पाकडे जातीने लक्ष द्यायचो. पाठपुरावा करायचो. तेव्हा कुठे कामं उरकतात. पुणे मेट्रोचं काम देखील त्याकाळात वेगानं झालं. विकास कामं तडीस नेण्यासाठी पाठपुरावा हा करावाच लागतो. प्रत्येक कामावर माझं बारकाईने लक्ष असतं. आताचे कारभारी किती बैठका घेतात ते आता तुम्हीच बघा, असा टोलाही त्यांनी लगावला.