साईबाबांची शिर्डी बेमुदत बंद? मंदिरासंदर्भातील कोणत्या निर्णयास ग्रामस्थांचा विरोध

shirdi sai mandir security : शिर्डी ग्रामस्थ आणि केंद्र सरकार यांचा वाद सुरु झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. त्यासाठी बेमुदत शिर्डी बंद पुकारला आहे.

साईबाबांची शिर्डी बेमुदत बंद? मंदिरासंदर्भातील कोणत्या निर्णयास ग्रामस्थांचा विरोध
शिर्डी साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
Image Credit source: Google
| Updated on: Apr 27, 2023 | 9:30 AM

मनोज गाडेकर, अहमदनगर : शिर्डीतील साई मंदिर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. शिर्डीत नेहमी भाविकांची गर्दी असते. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साई मंदिराला उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. यामुळे केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयास शिर्डीकरांनी विरोध दर्शवला आहे. त्यासाठी येत्या १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे. यामुळे केंद्र सरकार आणि शिर्डी ग्रामस्थ अशा संघर्ष चिघळणार आहे.

काय आहे विषय

शिर्डी मंदिरला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कंमाडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. मात्र ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावर कोर्टाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवलीय. मात्र शिर्डीतील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नुकतेच शिर्डीतील नागरिकांनी हनुमान मंदिराजवळ भिकमांगो आंदोलन केले.

आता बेमुदत बंद

नागरिकांनी CISF नियुक्तीला विरोध केला आहे. त्यासाठी १ मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक दिली आहे.
शिर्डी ग्रामस्थ आता १ मे पासून बंद पाळणार आहेत. शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे. शिर्डी बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे.

का आहे विरोध

शिर्डी ग्रामस्थांचा CISF सुरक्षेला विरोध आहे. cisf सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होणार असल्याचे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. संस्थानकडे अगोदरच दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना केंद्रीय सुरक्षा का ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे CISF सुरक्षेला विरोध करण्यासाठी सर्व शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत.
साई संस्थानला सध्या स्वतःच्या सुरक्षारक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. हिच सुरक्षा कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

भाविक-सुरक्षादलात वाद

मागील महिन्यात भाविक आणि सुरक्षा दलात वादही झाला होता. गेट क्रमांक 5 हे आऊटगेट असून, तेथून प्रवेश दिला जात नाही. मात्र साईभक्तांची एक पिशवी आतमध्ये राहिली होती. ती घेण्यासाठी आत जाऊ ‌देण्याचा आग्रह साईभक्तांनी धरला. मात्र सुरक्षा रक्षकांनी आऊटगेट ऐवजी आत जाणाऱ्या गेट ने जा, असं म्हटल्या वाद झाला. त्यावेळी मारहाण झाली.

Follow Us