पुरंदर विमानतळाची जागा बदलण्यास शिवतारेंचा विरोध, यशवंतराव चव्हाणांच्या दाखल्यासह पवारांना पत्र

| Updated on: Feb 14, 2021 | 8:21 AM

पारगाव वगळून विमानतळ अगोदरच्या नियोजित जागेवरच करावे. विमानतळ बाधितांना द्यावयाचा मोबदला तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवतारेंनी पत्राद्वारे केली आहे (Vijay Shivtare Sharad Pawar Purandar Airport)

पुरंदर विमानतळाची जागा बदलण्यास शिवतारेंचा विरोध, यशवंतराव चव्हाणांच्या दाखल्यासह पवारांना पत्र
विजय शिवतारे, शरद पवार
Follow us on

पुणे : पुरंदरच्या नियोजित विमानतळाची जागा बदलण्यास शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी विरोध केला आहे. शिवतारेंनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आठवण सांगत शिवतारेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Shivsena Min Vijay Shivtare writes letter to Sharad Pawar over Purandar Airport)

“मोबदला पाहून शेतकरी निर्णय घेतील”

पुरंदरमधील नियोजित विमानतळाची जागा बदलण्यास आपला विरोध आहे. पारगाव वगळून विमानतळ अगोदरच्या नियोजित जागेवरच करावे. विमानतळ बाधितांना द्यावयाचा मोबदला तात्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवतारेंनी पत्राद्वारे केली आहे. मोबदला पाहून शेतकरी आपला निर्णय घेतील. राजुरी, रीसे, पिसे, मावडी, पिंपरी, पांडेश्वर, नायगाव या नवीन गावात विमानतळ केल्यास त्याचा पुरंदरच्या विकासाला फायदा होणार नाही, अशी भूमिका विजय शिवतारेंनी मांडली आहे.

गायरान जमिनी दोन्ही ठिकाणी किरकोळ स्वरुपात आहेत. वन जमिनीसुद्धा फार नाहीत. याउलट जुन्या गावांमध्ये 2001 पासून आजपर्यंत जवळपास 3,500 एकर जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत. म्हणजेच बाहेरून आलेल्या भांडवलदार लोकांनी किंवा व्यावसायिकांनी या जमिनी खरेदी केलेल्या आहेत, याकडे शिवतारेंनी लक्ष वेधले आहे.

“समृद्धी महामार्गाचे जिवंत उदाहरण”

मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी फार कमी लागणार आहेत. नवीन जागेचा हट्ट कायम ठेवल्यास परवानग्या आणि इतर कामात मोठा वेळ वाया जाण्याचा धोका आहे. समृद्धी महामार्गाचे आपल्यासमोर जिवंत उदाहरण आहे, असंही विजय शिवतारे म्हणतात.

समृद्धी महार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली होती. पण सरकारने मोबदला जाहीर केल्यावर त्याच शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येत सरकारला स्वखुशीने जमिनी बहाल केल्या. पुरंदर विमानतळाच्या बाबतीतही सरकारने मोबदला जाहीर केल्यास आणि तो समाधानकारक असल्यास शेतकरी मोठ्या मनाने सकारात्मक होतील. (Shivsena Min Vijay Shivtare writes letter to Sharad Pawar over Purandar Airport)

यशवंतराव चव्हाण यांची आठवण

शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात विजय शिवतारे यांनी यशवंतराव चव्हाण यांची आठवण सांगितली. उजनी धरण उभारताना शेतकऱ्यांनी आणि विशेषतः वारकऱ्यांनी प्रचंड विरोध केला होता. पण यशवंतरावांनी मनोमन पांडुरंगाची माफी मागितली आणि धरण पूर्ण केले. पुढे त्याच उजनी धरणाने सबंध पश्‍चिम महाराष्ट्राचे चित्र पालटल्याचे शिवतारेंनी पत्रात म्हटलं आहे. पुरंदरच्या पुढच्या पिढ्यांसाठी तेवढा त्रास माझ्यासहीत आपल्यालाही सहन करावा लागेल, असेही शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

Photo : पुरंदरमध्ये विमानतळाचा प्रस्ताव, शरद पवारांकडून केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट

पुरंदरचं प्रस्तावित विमानतळ बारामतीला हलवण्याचा पवारांचा डाव, विजय शिवतारेंचा हल्लाबोल

(Shivsena Min Vijay Shivtare writes letter to Sharad Pawar over Purandar Airport)