दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, विद्यार्थ्यांसाठी असा होणार बदल

new curriculum framework : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इतर अनेक महत्वाचे बदल नवीन आराखड्यात केले आहेत.

दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय, विद्यार्थ्यांसाठी असा होणार बदल
Student
Jitendra Zavar | Updated on: Aug 24, 2023 | 7:52 AM

अभिजित पोते, पुणे | 24 ऑगस्ट 2023 : दहावी, बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईंट म्हटले जाते. यानंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे, यासंदर्भातील निर्णय विद्यार्थी घेतात. आता दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसंदर्भात काही बदल मंत्रालयाने केले आहे. हा बदल करुनच आता २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात पुस्तके येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा हा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीकडून हा आराखडा प्रसिद्ध झाला आहे.

काय आहे बदल

दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. हा बदल लक्षात घेऊनच अभ्यासक्रमाची आखणी आगामी शैक्षणिक वर्ष २०२४२५ साठी करण्यात येत आहे. त्यानंतर ही पाठ्यपुस्तके येणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार केला जात आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांकडे असेल.

का केला बदल

विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षेचा ताण येऊ नये, या परीक्षा त्याच्यासाठी सुलभ असाव्या, त्यांना चांगले गुण मिळविण्याची संधी मिळावी, या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन भाषा सक्तीच्या असणार आहे. त्यातील एक भाषा स्थानिक भारतीय भाषा असणार आहे.

अशी असेल रचना

नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाची रचना बदल करण्यात आली आहे. नव्या धोरणात ५-३-३-४ अशी तयार केली गेली आहे. म्हणजेच तीन ते आठ वय असणारे पहिल्या पाच गटात, त्यानंतर आठ ते ११ वय असणारे दुसऱ्या तीनच्या गटात, ११ ते १४ वय असणारे तिसऱ्या तीनच्या गटात तर आणि १४ ते १८ असे वयोगटानुसार शेवटचा चारचा गट आहे.

Follow Us