Bhama Askhed Project | भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्यावर भिडले तो प्रकल्प नेमका कसा आहे?

| Updated on: Jan 01, 2021 | 6:17 PM

पुणे शहराच्या पूर्व भागासाठी भामा आसखेड धरणातून पाणी घेण्याची योजना आहे. (Pune Bhama Askhed Project Information) 

Bhama Askhed Project | भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्ते ज्यावर भिडले तो प्रकल्प नेमका कसा आहे?
Follow us on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सध्या या ठिकाणी तणावपूर्वक वातावरण पाहायला मिळत आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे श्रेयवादावरुन या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे बोललं जात आहे. (Pune Bhama Askhed Project Information)

भामा आसखेड प्रकल्प नेमका काय?

पुणे शहराच्या पूर्व भागासाठी भामा आसखेड धरणातून पाणी घेण्याची योजना आहे. पुण्यातील पूर्व भाग म्हणजे, खराडी, चंदननगर, विश्रांतवाडी, धानोरी, कळस या भागाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. 2014 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊन पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते.

मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या, त्यावरून होणारा वाद, राजकीय हस्तक्षेप आणि आता श्रेयावरून हा प्रकल्प गेल्या सहा-साडेसहा वर्षांपासून रेंगाळला. त्यामुळे पुण्यातील पूर्व भागातील रहिवाशांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण करण्यात आली. पाण्याचा उपसा करणाऱ्या जॅकवेल, जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्‍यांची चाचणी झाली. या प्रकल्पांतून धानोरी, वडगाव शेरीपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचे चाचण्यांमधून दिसून आले. या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींचीही तपासणी पूर्ण झाल्याने पाणीपुरवठ्यात फारशा अडचणी राहणार नाहीत, असेही सांगण्यात आले.

मात्र त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत या योजनेच्या उद्धाटनावरुन वाद रंगला. या योजनेचे श्रेय नक्की कोण घेणार, यावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. या वादावर तोडगा निघावा यासाठी या प्रकल्पाचे उद्धाटन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमधील वाद संपेल, असे म्हटलं जात होतं. (Pune Bhama Askhed Project Information)

भामा आसखेड प्रकल्पाची माहिती

दररोज २०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. पुणे शहरातील नगर रस्ता परिसरात या प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या परिसराची लोकसंख्या २०४१ पर्यंत 14.50 लाख होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 50 टक्के (198.08 कोटी), राज्य सरकारकडून 20 टक्के (76.03 कोटी) आणि पुणे महानगरपालिकेकडून 30 टक्के (114.051 कोटी) इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला. साधारण 380.16 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला 5 जुलै 2013 रोजी मान्यता देण्यात आली.

आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून देण्यात येणार्‍या एकूण निधीपैकी दोन हप्त्यातील निधी प्राप्त झाला आहे. तर तिसरा हप्ता मिळण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. त्यात केंद्र सरकारकडून ७६.०३ कोटी तर राज्य सरकारकडून  ३०.४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे सहा पॅकेजमध्ये विभाजीकरण

Package No Name Estimated Cost
1 जॅकवेल आणि पंप हाऊसची उभारणी रुपये 54.89 कोटी
2 प्रक्रियेसाठीचे पाण्याची तरतूद आणि त्यासाठी पाईपलाईन उभारणी रुपये 127.44 कोटी
3 कुरुली येथे पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे रुपये 58.68 कोटी
4 प्रक्रिया झालेले पाणी पुरविण्यासाठी पाईपलाईन उभारणी रुपये 70.77 कोटी
5 मुख्य पाईप लाईनची तरतूद आणि उभारणी रुपये 55.08 कोटी
6 प्रत्येकी दोन दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेले सात ईएसआरची उभारणी रुपये 12.69 कोटी

या प्रकल्पासाठी आतापर्यंत 172 कोटी रुपये खर्च झाले आहेत. ऑक्टोबर 2015 पासून स्थानिक आमदार आणि शेतकर्‍यांनी त्यांच्या काही मागण्यासाठी या प्रकल्पाचे काम थांबविले आहे. त्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यानंतर 13 मे 2016 रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली. (Pune Bhama Askhed Project Information)

यानंतर राज्य सरकारचे विभाग आणि संबंधित अधिकार्‍यांचा अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर स्थानिक आमदार आणि शेतकर्‍यांच्या बहुतेक मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जून 2016 पासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. ही प्रक्रिया करण्यासाठीचे पाणी प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यासाठी भामा आसखेड धरणापासून ते भांबोली येथील बीपीटी पर्यंत आठ किलोमीटरची पाईपलाईनचे काम स्थानिक आमदाराने पुन्हा एकदा थांबविले होते.

या प्रकल्पांतर्गत धरणापासून शहराच्या पूर्व भागापर्यंत 42 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. जुन्या आणि नव्या अशा 26 पाण्याच्या टाक्‍या आहेत. या प्रकल्पातून विविध भागांतील 10 ते 12 लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होणार आहे. (Pune Bhama Askhed Project Information)

संबंधित बातम्या : 

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

वर्ष नवे, हर्ष नवा, अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर