…आणि कल्याणच्या वर्षा राऊतांना हरवलेल्या दागिन्यांची बॅग मिळाली, लोकलमध्ये बॅग विसरलात तर चिंता करु नका

| Updated on: Feb 03, 2021 | 4:51 PM

रेल्वेत तुम्ही बॅग विसरलात तर चिंता न करता योग्य पावलं उचलणं जास्त आवश्यक असतं (Railway police find missing jewellery worth of rs 6 lakh).

...आणि कल्याणच्या वर्षा राऊतांना हरवलेल्या दागिन्यांची बॅग मिळाली, लोकलमध्ये बॅग विसरलात तर चिंता करु नका
Follow us on

कल्याण (ठाणे) : लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण बऱ्याचदा गर्दीमुळे आपल्या हातातली बॅग स्वत:कडे न ठेवता बॅग ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या जागेवर बॅग ठेवतो. बऱ्याचदा आपल्याला बसायला जागाही मिळते. मात्र, आपण तरीही बॅग हातात घेत नाही. अशावेळी अचानक झोपेची डुलकी लागायला लागते. त्यामुळे आपण झोपतोही, पण अचानक आपल्याला हव्या असणाऱ्या रेल्वे स्थानकाची अनाउन्समेंट होते आणि आपण जागी होतो (Railway police find missing jewellery worth of rs 6 lakh).

रेल्वेस्टेशन आल्याने आपण धावत जातो आणि गाडीखाली उतरतो. त्यानंतर फलाटावरुन गाडी निघून जाते. या सर्व धावपळीत आपली बॅग गाडीतच राहिल्याची आठवण नंतर आपल्याला येते. बऱ्याचदा बॅगेत फक्त डब्बा असल्याकारणाने आपण विषय सोडून देतो. पण बॅगेत महत्त्वाचे कागदपत्रे आणि दागिने असले तर काय? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. अशावेळी तातडीने योग्य पावलं उचलल्याने तुम्हाला तुमची बॅग मिळू शकते. कारण कल्याणच्या एका महिलेला तसा अनुभव आला आहे (Railway police find missing jewellery worth of rs 6 lakh).

कल्याणमध्ये राहणाऱ्या वर्षा राऊत ही महिला एक लग्न समारंभासाठी ठाण्याला गेली होती. लग्न समारंभ आटपून वर्षा राऊत यांनी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ठाणेहून लोकल पकडली. कल्याण स्टेशन बाहेर येताच वर्षा राऊत यांना आठवण आली की त्यांची दागिन्यांनी बॅग लोकलमध्येच राहिली. घाबरलेल्या वर्षा राऊत यांनी ही माहिती कल्याण आरपीएफच्या 182 या हेल्प लाईन नंबरवर फोन करुन सांगितली. ही माहिती मिळताच डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव यांनी पुढील प्रकिया सुरू केली.

वर्षा राऊत ज्या लोकलने आल्या होत्या ती लोकल ठाकुर्ली स्थानकावर सायडींगला उभी केली होती. वर्षा या शेवटच्या महिला डब्ब्यात बसल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच आरपीएफ उपनिरीक्षक आदेश कुमार प्रधान, आरपीएफ एम.बी. हिवाळे आणि किशोर येळने यांनी ठाकुर्ली स्थानकात जाऊन पिवळ्या रंगाची बॅग शोधून काढली. शोधलेली बॅग मिळाली आहे ही माहिती मिळताच वर्षा राऊतांना आनंद गगनात मावण्याजोगा नव्हता. अशाप्रकारे डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफूल सिंग यादव यांनी वर्षा राऊत यांचे 6 लाखांचे दागिने परत केले आहेत.

वर्षा राऊत यांच्या या प्रकरणावरुन आपणही आपली हरवलेली बॅग परत मिळवू शकतो, याची शाश्वती होते. त्यासाठी रेल्वे पोलिसांकडे तातडीने तक्रार करणं आवश्यक असतं. तातडीने तक्रार केल्यास तातडीने त्यावर कारवाई होते. याशिवाय लोकल ट्रेनमध्ये वस्तूच्या काय लहाण मुलंदेखील हरवले तरी पोलिसांनी शोधून काढल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनमध्य एखादी मौल्यवान वस्तू किंवा बॅग चुकून राहिली तर घाबरुन जाऊ नका. सर्वात आधी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती द्या. पोलीस आपली कारवाई लगेच सुरु करुन तुम्हाला नक्कीच ती वस्तू शोधून देण्यात मदत करतील.

हेही वाचा : ‘तो’ हॅशटॅग, अकाउंट हटवा, नाही तर कारवाई करू; केंद्राची ट्विटरला फायनल नोटीस