
गेल्या काही महिन्यांपासून सतत कोसळणाऱ्या पावसाने दसरा, दिवाळीतही राज्याला झो़डपून काढलं आहे. आता नोव्हेंबर महिना उजाडला, थंडीची चाहूल तर दूरच पण जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे घराघरातील छत्र्या अजूनही बाहेरच आहेत. पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणत नुकसान, पिकं खराब, त्यामुळे दैनंदिन जीवनावरही परिणाम होताना दिसतोय. भारतीय हवामान विभागाने आजही पावासाचा मोठा इशारा दिला असून पुढील काही तास अत्यंत महत्वाचे आहेत. रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले असून आज सोमवारच्या दिवशीही बराच पाऊस कोसळू शकतो असा अलर्ट देण्यात आला आहे.
आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक भागांताही अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत. मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला. सोमवारी देखील मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालं आहे. आज बीड, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर राज्यातील इतर भागांतही वेगाने वारे वाहतील, जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात तीन दिवस पावसाची विश्रांती
पुण्यात तीन दिवस पावसाची विश्रांत होती. शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. पुढील तीन दिवस देखील पावसाचे विश्रांती कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे . त्यामुळे पावसाने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
थंडीची चाहूल 6 नोव्हेंबरनंतरच
नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीचा काही नामोनिशाण दिसत नाहीये. येता जात पडणाऱ्या पावसामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात थंडीची चाहूल सहा नोव्हेंबरनंतरच लागेल .
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 6 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे.
सप्टेंबर अखेर डेंग्यूचे रुग्ण वाढले
राज्यात सप्टेंबर अखेरीस डेंग्यूचे 9728 रुग्ण आढळले. मुंबईमध्ये रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे, मात्र मृत्यूची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली. राज्यातील डेंग्यू तापाचा फैलाव वाढत असून यावर्षी सप्टेंबर अखेरीस हजारो रुग्ण आढळले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंखेत वाढ झाली असून आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रण मोहिमेला गती दिली आहे.