Maharashtra Rain update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने घेतला 65 जणांचा जीव! 1 जूनपासूनची धक्कादायक आकडेवारी समोर

| Updated on: Jul 07, 2022 | 9:06 AM

महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार एक जूनपासून ते आतापर्यंत पावसाने 65 जणांचा बळी घेतला आहे, तर 57 जण जखमी झाले आहेत.

Maharashtra Rain update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने घेतला 65 जणांचा जीव! 1 जूनपासूनची धक्कादायक आकडेवारी समोर
Image Credit source: TV9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पाऊस सुरूच आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी मुंबईमध्ये (Heavy Rains) तर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये (Mumbai) गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आज देखील मुंबईच्या अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत धोकादायक ठिकाणांवरून 4500 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाने 65 जणांचा बळी घेतला आहे, तर पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनेत 57 जण जखमी झाले आहेत. कोकणात परिस्थिती गंभीर बनली आहे, रत्नागिरीत पाऊस सुरूच असून वाशिष्ट नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर परशुराम घाट खबरदारी म्हणून पुढील आठ दिवस जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

मुंबईत पाऊस सुरूच असल्याने मुंबईच्या हिंदमाता, दादर, सायन आणि अंधेरीच्या सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने दळणवळण प्रभावित झाले आहे. अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रेन देखील विलंबाने धावत आहेत. हवामानविभागाकडून पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पावसामुळे जीवितहानी होणार नाही याकडे लक्ष द्या असे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. तसेच आतापर्यंत सुमारे साडेचार हजारांपेक्षा अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

एनडीआरएफचे तेरा पथकं तैनात

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांत अधिक पाऊस आहे, अशा जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफचे तेरा पथके तैनात करण्यात आली आहेत. तर गरज भासल्यास आणखी नऊ पथक हे स्टँड बायवर ठेवण्यात आली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून, या काळात राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकण विभागासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.