लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत आज पहिली सभा घेतली. पहिल्याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खालच्या स्तरावर जाऊन बाळासाहेबांच्या नावापुढे लागलेलं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं.

लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांनी बाळासाहेबांच्या पुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं - राज ठाकरे
shailesh musale | Updated on: Nov 04, 2024 | 7:52 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकल्याची टीका केली. काही ठिकाणी बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावल्याने देखील राज ठाकरे यांनी टीका केली. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

राज ठाकरे म्हणाले की, ‘वेगळ्या विचारांची युती आणि आघाडी होती. पण सर्वात लाजीरवाणी गोष्ट उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानंतर बाळासाहेबांच्या पुढचं हिंदुहृदयसम्राट काढून टाकलं. काही ठिकाणी तर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेलं मी पाहिलं. स्वत:च्या स्वार्थासाठी इतक्या खालपर्यंत गेले तुम्ही. सभापतींना तेव्हा सांगितलं होतं बाळासाहेबांचं एक चित्र विधानभवन आणि विधानपरिषदेच्या सभागृहात लावा. त्यांना कळेल आपण इथपर्यंत कोणामुळे आलो. हे इकडे बघत होते तिकडे ४० निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही आपले ४० आमदार गेले. हे आमदार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे म्हणाले होते, काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासोबत बसणं म्हणजे श्वास घेता येईना. पण नंतर अचानक कळलं मांडीवर अजित पवार येऊन बसले. कोणतं राजकारण सुरु आहे. काय चालुये. महाराष्ट्राचं भविष्य हे आहे का?’

‘शेतकरी आत्महत्या करतोय. यांची मात्र मज्जा सुरु आहे. हे माणसं असे का वागतात कारण तुम्ही चिडत नाहीत. याच लोकांना पुन्हा मतदान करतात म्हणून तुम्हाला गृहीत धरले आहे. कसेही वागले तरी चालेल. परत रांगेत उभे राहतील आणि आम्हालाच मतदान करतील. ही समज तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ठिकाण्यावर येणार नाही. असा महाराष्ट्र कधी नव्हता.’

‘गद्दारी करणारे आधी मान खाली घालून जायचे. आता मात्र त्यांना काहीच वाटत नाही. मतांचा अपमान करुन देखील तुम्ही शांत बसत असेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला. शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले. आता तर पक्ष आणि चिन्हच ताब्यात घ्यायचं. असं कधी पाहिलं नव्हतं. शिंदे आणि पवारांनी नाव आणि चिन्ह घेतलं. शिवसेना नाव हे उद्धव ठाकरे किंवा शिंदेची प्रॉपर्टी नाही. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माणसं पळवली जाताय.’ असं ही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us