मोठी बातमी! कोल्हापुरात तुफान राडा, राजू शेट्टी, क्षीरसागर यांचे समर्थक भिडले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. यामुळे कोल्हापुरच्या शिवाजी महाराज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी पायताण मारून आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. राजेश क्षीरसागर समर्थकांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. यामुळे कोल्हापुरच्या शिवाजी महाराज चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा
काल याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी पायताण मारून निषेध व्यक्त केला होता. या घटनेनंतर आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने त्याच ठिकाणी आंदोलन करत प्रत्युत्तर दिले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र तरीही दोन्ही नेत्यांचे समर्थक आमनेसामने आले आणि मोठा राडा झाला.
राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजू शेट्टी यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी पायताण मारून आंदोलन केले होते, त्याच ठिकाणी राजू शेट्टी यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत कालच्या आंदोलनाचा निषेध केला. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील हा वाद आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र परिसरात मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला असल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.