Earthquake : हिमालय हादरला… पुन्हा हाहा:कार? तिबेटमध्ये भूकंपाचे तीव्र झटके; टेन्शन नेपाळला
हिमालयीन प्रदेशात चिंतेचे वातावरण आहे. नेपाळमधील जलप्रलयानंतर तिबेटमध्ये ५.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. यापूर्वी नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले होते, ज्यात शेकडो लोक बेपत्ता झाले आणि व्यापार मार्गही तुटला.

नेपाळमध्ये जलप्रलयाने हाहाकार उडालेला असतानाच आणखी एका घटनेने हिमालय परिसर हादरला आहे. तिबेटमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता 5.0 एवढी होती. त्यामुळे तिबेटमधील नागरिक भयभीत झाले आहेत. सात दिवसांपूर्वी नेपाळमध्ये जलप्रलय आला होता. त्याचा फटका तिबेटलाही बसला होता. तिबेटमध्येही महापूर आल्याने 100 लोक बेपत्ता झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता भूकंप आल्याने तिबेटीयन नागरिक भयभीत झाले आहेत.
तिबेटमध्ये आलेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याची पुष्टी झालेली नाही. मात्र, भूकंप होताच तिबेटमधील नागरिकांनी लगेच घराबाहेर पळ काढला. आहे त्या परिस्थितीत सर्वच जण जीवमूठीत घेऊन पळाले. तसेच पूर वगैरे तर आला नाही ना? याची माहिती घेण्यासही नागरिकांनी सुरुवात केली. बराच वेळ घराबाहेर काढल्यानंतर आणि धोका टळल्याची खात्री पटल्यानंतर तिबेटीयन नागरिकांनी घरात प्रवेश केला. मात्र, भूकंपामुळे देशाला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं जात आहे.
जीवित हानी नाही, पण चिंता वाढली
मात्र, या भूकंपामुळे हिमालयाच्या परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. भूकंपाच्या झटक्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये. 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने शास्त्रज्ञही भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
नेपाळ आणि तिबेटला फटका
दुसरीकडे 26 ऑगस्ट रोजी नेपाळच्या रासुवा जिल्ह्यात आणि चीन-तिबेटच्या क्षेत्रात अचानक महापूर आला होता. हा महाविनाशकारी पूर होता. ग्लेशियर तुटल्याने नदीत जाऊन पडला. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. ग्लेशियरमुळे नैसर्गिक सरोवर तयार झालं. त्यातच पाण्याचा दाब वाढला आणि नंतर बांध फुटून हे पाणी प्रचंड आक्राळविक्राळ लाटांसह गावागावात घुसलं. त्यामुळे नेपाळच्या रासुवा जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं आहे.
नेपाळच्या या जलप्रलयात 1200 हून अधिक लोक मृत्यूमुखा पडले आहेत. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. या जलप्रलयात नेपाळची गावे जमीनदोस्त झाली. घरे, इमारती, पूल, टॉवर सर्व काही पाण्यात जमीनदोस्त झालं. शेती वाहून गेली. रस्ते वाहून गेले आहेत. अनेक गावांचा अजूनही जनसंपर्क तुटलेला आहे. अनेक गावं अजूनही अंधारात आहेत. नेपाळमधील डेडबॉड्या बिहारमध्ये वाहून येत आहेत. आज सात दिवस झाले तरी नेपाळची परिस्थिती सावरलेली नाहीये.
केवळ नेपाळलाच नाही तर या जलप्रलायाचा सर्वाधिक तिबेटलाही बसला आहे. नेपाळ आणि तिबेट दरम्यान असलेला ऐतिहासिक व्यापारी मार्गच वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापार ठप्प झाला आहे. दोन्ही देशांना जोडणारा हा एकमेव पारंपारिक रस्ता होता. तिबेटमध्येही पूर आल्याने या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं. तिबेटमधील पुरात 100 लोक बेपत्ता झाले आहेत.
