
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनंतर बीडसह राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी ठिक-ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. आज मुंबईमध्ये आक्रेश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली, कुटुंबासोबत चर्चा केली. या भेटीनंतर आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले आठवले?
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे मोर्चा होता. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचं कुटुंब मुंबईमध्ये आलं होतं. त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली. या केसमध्ये जवळजवळ सगळे आरोपी पकडण्यात आले आहेत. आंधळे नावाचा आरोपी अजून फरार आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा अशी मागणी होती, त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याच्यावर 302 लावावे अशी मागणी देखील आहे. वाल्मिक कराडविरोधात पोलिसांना सगळे पुरावे मिळाल्यामुळे त्याच्यावर मोकाक अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
आता या प्रकरणात कोणताही आरोपी सुटणार नाही, त्यांना फाशीची शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. कोणताही आरोपी सुटणार नाही या दृष्टिकोनातून पोलिसांनी ही केस बनवली आहे. आरोपींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका माझी आहे, मी त्याच्यांसोमर देखील हीच भूमिका मांडली आहे. असं आठवले यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया
दरम्यान या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे, यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पॉलिटिकल आहे. वाल्मिक कराड याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, ही गोष्ट खरी आहे. पण खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध दिसत नाही. ‘परंतु नैतिकतेच्या आधारे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर ठीक आहे,’ पण मला असं वाटतं राजीनाम्याची मागणी ही पॉलिटिकल आहे. या संदर्भात काय करायचं हा निर्णय अजित पवार आणि धनंजय मुंडे घेतील असं आठवले यांनी म्हटलं आहे.