
पुण्यात काल काँग्रेसला धक्का बसला. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असा दावा केला. त्यावर आता रवींद्र धंगेकर यांनी समोर येऊन उत्तर दिलय. “ही जी वक्फ बोर्डची जागा आम्ही घेतली, त्याचा कोर्टाने लिलाव केला होता. 1966 पासून हा विषय आहे, माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हपासूनचा हा विषय आहे. शुन्य टक्के चूक असताना राजकीय बळी आम्ही ठरलो” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
“वरिष्ठ पातळीवरुन त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यावेळी कधी डगमगलो नाही, घाबरलो नाही. ती प्रॉपर्टी घेताना कर्ज काढून घेतली होती. रेरा रजिस्ट्रेशन आहे. विधानसभेला, लोकसभेला हा विषय आला. राजकीय लोकांनी मसाला भरुन यात मला अडचणीत आणण्याच काम केलं” असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. “यात कुठेही असं वाटत नाही की, काही चुकीच काम केलय. यात दोन गोष्टी आहेत, वक्फ बोर्डाची जागा घेतली, यात दु:ख झालं पाहिजे मुस्लिम समाजाला, पण दु:ख होतय भाजपला” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
‘मला काँग्रेसने भरपूर दिलं’
भाजपच्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला का? या प्रश्नावर रवींद्र धंगेकर यांनी “तुम्ही माहिती घ्या असं उत्तर दिलं. मी या त्रासाला शुन्य टक्के घाबरतो. हा विषय सात-आठ महिन्यांपासून आहे” या त्रासामुळे पक्ष बदलला का? त्यावर कार्यकर्ते आणि कुटुंबियांशी चर्चा करुन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याच त्यांनी सांगितलं. “मला काँग्रेसने भरपूर दिलं. काँग्रेस सोडताना दु:ख होतय. मला कोणी त्रास दिला नाही. कोणी त्रास देऊ शकत नाही. माझी कोंडी वैगेरे कोणी केली नाही. ते राऊतांच मत आहे. ते त्यांची भूमिका बोलतायत. आमची चूक असेल, तर जेलमध्ये पाठवा. कारण चुकीच काम केलेलं नाही” असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं.
पक्ष का बदलला?
रवींद्र वायकर यांच्याप्रमाणे रवींद्र धंगेकर यांना फोडलं असं म्हटलं जातय. त्यावर “कार्यकर्त्यांच मत विचारात घेऊन निर्णय घेतला. हा निर्णय घेताना, काँग्रेसचे मी आभार मानतो. त्यांनी दोनदा उमेदवारी दिली. प्रचंड ताकदीने माझ्यामागे उभे राहिले” लोकसभेपासून कोंडी केली जात होती, असा आरोप होतोय.