
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी अपघात झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना हा अपघात घडला. 29 जानेवारी रोजी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या विमान अपघातावर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासाठी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी ट्रोलवर देखील निशाणा साधला आहे.
“मला भाजपचे लोक का ट्रोल करतायेत”
‘मी अजित पवार यांच्या घातपाताचा मुद्दा मांडतोय मला भाजपचे लोक का ट्रोल करत आहेत. मी या ट्रोलरची माहिती घेतली तर ते भाजपच्या बड्या नेत्याचे ट्रोल आहे. यातील ट्रोलरने अपघाताच्या दोन ते तीन दिवस आधी एक ट्विट करून सात मिनिटाने डीलिट केलं होतं. महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप येईल अशी घटना घडणार आहे, असं त्याने म्हटलं होतं. पैसे घेऊन काम करणारे लोक आहेत’, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले, ‘आम्ही विश्वासाने एअरपोर्ट ऑथेरिटीला आमची माहिती देत असतो. आम्ही तेच आहोत सांगत असतो. ही सर्व माहिती ट्रोलर्सला पुरवली जाते. एअरपोर्ट ऑथोरिटीचे असे कोण लोक आहेत. ते माझी माहिती ट्रोलर्सला देतात. सर्व माहिती देतात. माझीच नाही. क्रिकेटरचीही माहिती देतात. लाज वाटते की नाही. आम्ही कष्टकरून माहिती काढतो आणि या ट्रोलर्सला फुकटात माहिती दिली जाते. त्यामुळे यामागे अजून कोणती वेगळी शक्ती आहे का? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. एअरपोर्ट ऑथोरेटी असू शकते. व्हिएसआर असू शकतो. आम्ही वेगळी माहिती घेतो. पण आमची ऑथेंटिक आणि सीक्रेट माहिती भाजपच्या ट्रोलर्सला पुरवली जाते. यावरून १०० टक्के शंका निर्माण होत आहे.’
“आमचा काका गेला”
पुढे रोहित पवार यांनी पायलटबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, काही लोकं यात राजकारण आणि मैत्री आणत आहेत. यात मोठे इन्व्हेस्टर आहेत. त्यात मी जाणार नाही. शेकडो कोटींची गुंतवणूक आहे. त्यामुळे कंपनीला वाचवलं जात आहे. १०० ते २०० कोटीसाठी कंपनीला वाचवू नका, अशी माझी इन्व्हेस्टरांना विनंती आहे. नाही तर आम्ही शांत बसणार नाही. आमचा काका त्यात गेला आहे. सुमित कपूर यांना दारू प्यायची सवय होती. जेटमध्ये त्यांचा पगार १० ते १२ लाख होता. पाच वर्ष ते बिना पगाराचे होते. त्यानंतर लेअर जेटमध्ये त्यांना संधी दिली. त्यानंतर लेअर जेटमध्ये आल्यावर त्यांना ३ लाख रुपये पगार आला. प्रत्येक फेरीचा २५ हजाराच्या आसपास होते. त्यामुळे हा पगार ६ लाखावर आला होता. ते डिप्रेशनमध्ये होते. व्यक्तिगत एका विषयाने ते डिप्रेशनमध्ये होते. त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना ब्लॅकमेल केले का? याची चौकशी झाली पाहिजे.