स्वत:च्या ताटात पडलेलं गाढवं ज्याला काढता येत नाही, तो..मंत्र्यांच्या ताटात काजू, बदामवरुन सुषमा अंधारेंनी संजय शिरसाटना सुनावलं
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकारावर बोचरी टीका केली आहे. "ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत, त्या शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काजू-बदाम खाणं तर दूरची गोष्ट आहे"

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यावर एल निनोचा प्रभाव तीव्रतेने जाणवत आहे. मागच्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. यामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी शेती संकटात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी पेरणी करु शकत नाहीय. दुसरीकडे जी पेरणी केली होती, ते पीक वाया जातय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून राज्यात कोरडा दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी होत आहे. राज्यातला शेतकरी दुष्काळाच्या या झळा सोसत असताना आज नांदेडमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे गेले होते. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी बैठकीत चक्क मंत्री आणि आमदारांसाठी काजू, बदाम देण्यात आले. त्यावरुन राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकारावर बोचरी टीका केली आहे. “ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत, त्या शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काजू-बदाम खाणं तर दूरची गोष्ट आहे. पण जे आपले 50-50 खोके, भ्रष्टाचाराच्या फायली लपवायला गेले आहेत. जे नवी मुंबई, सिडको, एमआयडीसीच्या जमिनी हडप करुन बसले आहेत. त्यांना शेतकऱ्याचं दु:ख कळणार नाही” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी सुनावलं.
जखमेवर मीठ चोळण्याचं काम
“मराठवड्यातला शेतकरी कोणत्या परिस्थितीतून जातोय. दुष्काळ जाहीर करण्यासाठी कसल्या बैठक घेता?. रेस्ट हाऊसवर बसून कसल्या बैठका करता, धरणं कोरडी पडली आहेत.रात्रीचा काही जिल्ह्यात तुरळक पाऊस पडला आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची भूमिका का घेऊ नये? चमकोगिरी हे मंत्री करतायत. शेतकरी दु:खी, खिन्न अवस्थेत असताना त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे शिंदेंचे मंत्री करत आहेत” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली.
बंडू जाधव राज्यात मंत्री आहेत का?
“मूळात बैठकांचा हा फार्स शिंदेंचे लोक का घेतात? संजय शिरसाटकडे कृषी खातं आहे का? बंडू जाधव राज्यात मंत्री आहेत का? यांच्याकडे कुठले अधिकार आहेत? ते दिलासा देऊ शकतात का? संजय शिरसाटकडे जे खातं आहे, ते त्याला नीट चालवता येतं का?. सामाजिक न्यायचा निधी कोण पळवून नेतय हे त्याला कळत नाहीय. स्वत:च्या ताटात पडलेलं गाढवं ज्याला काढता येत नाही. तो शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काय करणार?. ज्यांना कोळपणी, फवारणी, दुबार पेरणी, खुरपणी कळत नाही, अशा शिंदेंच्या मंत्र्यांनी चमकोगिरी करण्याची गरज नाही” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.