नागपूरच्या RSS मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी, पत्रातील दोन वाक्यांनी पोलिसांची झोप उडवली, नेमकं काय घडतंय?

नागपूरमधील संघ मुख्यालय आणि स्मृतिमंदिर परिसरात 'रेडिओअॅक्टिव्ह' पदार्थ टाकल्याच्या निनावी धमकीमुळे खळबळ उडाली असून, एटीएस आणि एनडीआरएफकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

नागपूरच्या RSS मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी, पत्रातील दोन वाक्यांनी पोलिसांची झोप उडवली, नेमकं काय घडतंय?
Rss Nagpur
| Updated on: Apr 30, 2026 | 9:09 AM

राज्याची उपराजधानी असेलल्या नागपूरमधील अत्यंत संवेदनशील ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला धमकी आली आहे. नागपूरच्या संघ मुख्यालय आणि स्मृतिमंदिरात रेडिओअॅक्टिव्ह (किरणोत्सर्गी) पदार्थ टाकल्याच्या एका निनावी पत्राने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना हे धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पत्रामुळे केवळ संघच नव्हे, तर नागपूर मेट्रो आणि भाजप कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

नेमके प्रकरण काय?

सोमवारी २७ एप्रिल रोजी टपालाद्वारे पोलीस आयुक्त कार्यालयात एक निनावी पत्र आले. डीएसएस नावाच्या एका कथित संघटनेने हे पत्र इंग्रजी भाषेत लिहिले आहे. त्यात संघाबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, संघ मुख्यालय, रेशीमबाग स्मृतिमंदिर आणि मेट्रो स्थानक यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सिझीयम-१३७ (Cesium-137) नावाची घातक रेडिओअॅक्टिव्ह पावडर टाकण्यात आली आहे. ही पावडर अत्यंत विनाशकारी असून यामुळे अनेक स्वयंसेवकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्याने केवळ रेडिएशनवरच न थांबता पत्रात असाही दावा केला आहे की काही दिवसांपूर्वी दोसरभवन मेट्रो स्थानकाजवळ सापडलेले डेटोनेटर्स आणि जिलेटिनच्या कांड्या त्यांनीच ठेवल्या होत्या. तो केवळ एक इशारा होता, खरा खेळ तर आता सुरू झाला आहे, अशा शब्दांत पत्रातून थेट आव्हान देण्यात आले आहे. या पत्रात संघाच्या कार्यपद्धतीवर आणि विचारधारेवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीकाही करण्यात आली आहे.

पत्रातील गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी तातडीने दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) पाचारण केले. एटीएसने एनडीआरएफ (NDRF) आणि मुंबई येथील अणुऊर्जा तज्ज्ञांच्या विशेष पथकाला बोलवून संपूर्ण परिसराची स्कॅनिंग केली. या तपासणीत संघ मुख्यालय (महाल), स्मृतिमंदिर (रेशीमबाग), भाजपचे गणेशपेठ येथील कार्यालय आणि मेट्रो स्थानक या ठिकाणांचा समावेश होता. सुदैवाने, अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने केलेल्या या तासाभराच्या तपासणीत कुठेही ‘सिझीयम-१३७’ किंवा इतर कोणतेही किरणोत्सर्गी कण आढळले नाहीत.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ 

यानंतर याप्रकरणी एटीएसच्या तक्रारीवरून सध्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एखाद्याने केलेला खोडसाळपणा आहे की यामागे खरोखरच एखादे मोठे षड्यंत्र आहे, याचा तपास पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा करत आहेत. शहरात खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Follow Us