सदाभाऊ खोत संतपाले, RTO ऑफिसमध्ये हळदीचे पोते पालथे, लिलाव सुरु, ‘सौदा करायचाय माझ्या बापाचा..’ काय झाली भानगड?

| Updated on: Apr 12, 2023 | 3:54 PM

हळदीची पोती रिकामी केली. हळदीचा लिलाव केला. या लिलावातून आलेले पैसे आरटीओ अधिकाऱ्याला द्यायचेत, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

सदाभाऊ खोत संतपाले, RTO ऑफिसमध्ये हळदीचे पोते पालथे, लिलाव सुरु, सौदा करायचाय माझ्या बापाचा.. काय झाली भानगड?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शंकर देवकुळे, सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कुपवाडमधील (Kupwad) सावळी येथे आज रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau khot) प्रचंड संतापलेले दिसून आले. एका शेतकऱ्याला झालेल्या त्रासामुळे सदाभाऊ खोत चिडले. त्यांनी सावळी येथील आरटीओ कार्यालयात शेतकऱ्याची हळदीची पोती नेली. ज्या अधिकाऱ्यानं शेतकऱ्याला दंड ठोठवला, त्याच्याविरोधात आंदोलन सुरु केलं. चला बोली लावलीय तुमच्या दारात… तुमचं देणं लागतोय..भीक लागलीय तुम्हाले, पगार नाहीत. उपाशी पोटावर धंदे करतायत.. सौदा करायचाय माझ्या बापाचा.. चला या इकडे बोली लागलीय… असे म्हणत आंदोलन सुरु केलं..

काय घडलं नेमकं कारण?

अहमद नगर जिल्ह्यातील राहुरी येथील शिवाजीराव यादवराव वने या शेतकऱ्याची हळद घेऊन जाणारी गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी सावळी येथे आज अडवली. हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपलाय हे पाहून गाडीतून शेतकऱ्याला उतरवलं. स्वतः गाडीत बसल्या. वजनकाट्याच्या तिथे तुम्ही या म्हणाल्या. अखेर एक रिक्षा पकडून शेतकरी वजनकाट्याच्या तिथे पोहोचले. गाडीतील हळद ओव्हरलोड असल्याचं दिसून आलं. त्यानंतर गाडीतील इन्शुरन्स संपल्याचंही निदर्शनास आलं. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला ३० हजार रुपये दंड ठोठवला. हे प्रकरण शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत गेलं. आधीच नुकसानीने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अशी आडकाठी केलेली पाहून सदाभाऊ खोतदेखील संतापले.

सावळी कार्यालयात आंदोलन

शेतकऱ्याला 30 हजार रुपये दंड केला. त्यामुळे संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी आरटीओ कार्यालय सावळी येथे हल्लाबोल करत आंदोलन केलं. अधिकाऱ्यांना जाब विचारला. तेथेच हळदीची पोती रिकामी केली. हळदीचा लिलाव केला. या लिलावातून आलेले पैसे आरटीओ अधिकाऱ्याला द्यायचेत, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
राज्य सरकार आणि परिवहन खात्याच्या कारभारावर सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला संताप. राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगाव की मरावं ? जनतेची लूट करणाऱ्या सरकारच्या लाडवलेल्या जावयांना सरकार आवरणार की नाही ? अधिकाऱ्यांचा मुजोरपणा सरकारने थांबवावा, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय.