यवतच्या दंगलीमागचे खरे सूत्रधार कोण? सामनातून दोन आमदारांवर गंभीर आरोप, नाव आली समोर

यवतमाळ येथील धार्मिक दंगलीत सरकारमधील काही व्यक्तींचा हात असल्याचा सामनाने आरोप केला आहे. एक वादग्रस्त व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे सुरू झालेली दंगल बाहेरून आलेल्या आमदारांमुळे अधिक गंभीर बनली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेले प्रतिक्रिया चकित करणारे आहेत.

यवतच्या दंगलीमागचे खरे सूत्रधार कोण? सामनातून दोन आमदारांवर गंभीर आरोप, नाव आली समोर
| Updated on: Aug 04, 2025 | 8:32 AM

महाराष्ट्रात जाती-धर्मामध्ये सलोखा बिघडवण्याचे काम सरकारमधील काही व्यक्तीच करत आहेत. दौंड तालुक्यातील यवत येथे एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानंतर धार्मिक दंगल उसळली. यामुळे दगडफेक, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी त्वरित कठोर पावले उचलून संबंधितांवर कारवाई केली होती, मात्र बाहेरून आलेल्या दोन आमदारांनी परिस्थिती आणखी भडकवल्याने दंगल अधिक गंभीर बनली, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून यवतमध्ये झालेल्या हिंसाचारवर भाष्य करण्यात आले. यवत येथे झालेल्या धार्मिक दंगलीवरून सरकार आणि विशेषतः भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. सरकारमधीलच काही लोक शांतता भंग करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत जे मतप्रदर्शन केले ते ‘चकित’ करणारे आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘‘यवतमध्ये घडलेल्या घटनेची माहिती मी घेतली आहे. एका बाहेरील व्यक्तीने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. लोक रस्त्यावर उतरले आणि गर्दीला नियंत्रित करण्यासाठी लाठीमार करावा लागला. काही लोक जाणूनबुजून तणाव निर्माण करण्यासाठी असे स्टेटस ठेवतात.’’ मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया चकित करणारी आहेच, पण अनुभवी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दंगलीचे खापर एका तरुणाने ठेवलेल्या व्हॉटस्अॅप स्टेटसवर फोडले. अजित पवार म्हणतात, ‘‘परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. 144 कलम लावले आहे. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. जातीय सलोखा ठेवणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे.’’ प्रश्न इतकाच येतो की, अजित पवार सांगतात त्याप्रमाणे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दंगे कोण भडकवत आहे? ते त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले.

आमदार जगताप व भाजपचे आमदार पडळकरांनी लोकांना जास्तच भडकवले

“महाराष्ट्रातील लोक इतके रिकामटेकडे कधीपासून झाले? याचा अर्थ तरुणांना रोजगार नाही, काम नाही, शेतीला उत्पन्न नाही. सारासार विचार करणे थांबले आहे. धर्माच्या बाबतीत येणाऱया सूचनांचे पालन करायचे व रस्त्यावर दंगे करायचे एवढेच काम लोकांना उरले. हे काही पुरोगामी, प्रगतशील महाराष्ट्राला शोभणारे नाही. यवतचा राडा हिंदू-मुसलमानांत झाला. त्यास जातीय वगैरे म्हणून लपवाछपवी का करायची? अजित पवार गटाचे आमदार जगताप व भाजपचे आमदार पडळकर हे यवतमध्ये आले व त्यांनी लोकांना जास्तच भडकवले. त्यातून लोक रस्त्यावर उतरले व दंगल उसळली. त्यामुळे दंगल उसळवणाऱया बाहेरील व्यक्ती या सरकार पक्षाच्याच आहेत व तणाव वाढावा, हिंदू-मुसलमानांत दंगा पेटावा यासाठीच या बाहेरील व्यक्तींनी ‘यवत’मध्ये प्रवेश केला होता”, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात जातीय सलोखा कोण बिघडवतय?

“यवतमध्ये शांतता भंग करण्याचे काम करणारे सरकारमध्येच आहेत. समाज माध्यमांवर ‘स्टेटस’ ठेवून भावना भडकवल्याबद्दल संबंधित बाहेरच्या व्यक्तीवर कायद्याने कारवाई झालीच होती. पोलिसांनी कठोर पावले उचललीच होती व त्यालाच कायद्याचे राज्य म्हणतात. हे कायद्याचे राज्य उलथवून टाकण्यासाठी दोन आमदार बाहेरून आले व त्यांनी शांततेचा भंग केला. दौंडचे आमदार श्री. राहुल कुल हेदेखील भाजपचे (नवहिंदुत्ववादी). त्यामुळे या नवहिंदुत्ववाद्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे सोडून दंगल भडकेल कशी यावरच लक्ष दिले. फडणवीस, अजित पवारांना मात्र प्रश्न पडलाय की शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीय सलोखा कोण बिघडवत आहे?” असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.