Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ; पुढील 4 दिवस कसं असणार हवामान?
rain update : महाराष्ट्रात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील इतरही काही भागात मागील काही दिवसांत धो धो पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळालं. मराठवाड्यातील काही तालुक्यात सरासरी अतिवृष्टीची नोंद झाली. राज्यातील अनेक धरणे भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे काही धरणांचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली आहे. तर विदर्भात पुढील चार दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार असल्याचे समोर आलं आहे.
राज्यात आज 2 ऑगस्ट रोजीही पावसाची शक्यता कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवमान विभागाने रविवारी 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातही मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याचे पाहायला मिळतंय. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात ऊन-पावसाचा खेळ
विदर्भात पुढील चार दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू राहणार आहे. नागपुरात आतापर्यंत 454.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुढचे चार दिवस पावसाची तीव्रता कमी राहणार आहे. यामुळे ढगाळ वातावरणामुळे पावसाचा खेळ सुरू राहील. दरम्यान पावसाचा जोर कमी होताच उकाडा वाढल्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे.
काल दिवसभरात केवळ चार मिलिमीटर पावसाची नोंद नागपुरात झाली आहे. अंशतः तापमानात वाढ झाल्याने उकाळा जाणवायला लागला आहे. 28 जुलैला पावसाने जोरदार धडक दिली एका दिवसात 180 मिलिमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतर तीन दिवस मध्यम तीव्रतेच्या पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे आतापर्यंत असलेल्या पावसाची कमतरता भरून निघाली. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असून सकाळपासून ऊन पडलं आहे.
