
Attack on Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना घडली. ते अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आणि त्यांना काळं फासत मारहाण केली. दरम्यान, या घटनेनंतर आता माझी हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.
काळं फासण्याच्या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी सोलापूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुरोगामी चळवळीचे काम थांबणार नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार संपणार नाहीत, असे ठणकावून सांगितले. तसेच माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असाही खळबळजनक आरोप त्यांनी केला. माझ्यासोबत जो प्रकार घडला त्याला सरकार जबाबदार आहे. माझ्या हत्येचा कट रचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आम्ही शिवराय , फुले आणि आंबेडकरांची विचारधारा मांडत आहोत. माझ्यावर हल्ला करणारे भाजपाचे कार्यकर्ते होते, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना आज किंवा उद्या पश्चात्तापच होईल. मी मराठा समाजातून येतो. गेल्या 30 वर्षांपासून मी काम करत आहे. मी समाजासाठी 30 वर्षांपासून काम रतोय. शाहू, फुलेंचा विचार संपणारा नाही. हा विचार दाबला जाऊ शकत नाही. मानवता, बंधूता अखंड राहिली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
माझी आणि ज्ञानेश महाराव यांच्याशी चर्चा झालेली आहे. संरक्षणाची मागणी करायला माझे कार्यकर्ते सक्षम आहेत. आम्ही संभाजीराजे भोसले पूर्ण समाजाला दाखवले. सरकारने माझ्यावर हल्ला केल्याचा कट उघडा करायला हवा. मला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. याआधी डॉक्टर दाभोळकरांचा खून झालेला आहे. पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत, असं म्हणत सरकारने यात लक्ष घालायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. आमचं काम चालूच राहणार आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितले.