Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीने राज्यात उधळला गुलाल! मोठ्या मताधिक्याने विजयी झाला उमेदवार 

| Updated on: May 19, 2023 | 7:08 PM

Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात अखेर गुलाल उधळला. राज्यात त्यांचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला.

Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीने राज्यात उधळला गुलाल! मोठ्या मताधिक्याने विजयी झाला उमेदवार 
विजयी सलामी
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : भारत राष्ट्र समितीने (Bharat Rashtra Samiti) अखेर विजयाचा गुलाल भाळी लावला आहे. महाराष्ट्रातील पहिले खाते या पक्षाने उघडले. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने राज्यातील राजकारणात पहिले पाऊल टाकले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांनी पहिला विजय नोंदवला. ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchyat Election) गुलालाची उधळण झाली. बीआरएसने राज्यात मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात आठ जिल्ह्यांतून बीआरएसला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. त्याचीच चुणूक पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीतून दाखवून दिली.

अंबेलोहळमध्ये इतिहास
भारत राष्ट्र समितीने राज्यातील राजकारणाची जमिनी कसण्यास सुरुवात केली आहे. राज्यात नवख्या असलेल्या या पक्षाने अजून पूर्णपणे हातपाय पसरले नाही. पण मराठवाड्यात पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बीआरएसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाला. गेल्या महिन्यात केसीआर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यात अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना प्रवेश दिला होता. अंबेलोहळ ग्रामपंचायत निवडणुकीत बीआरएसचे उमेदवार गफार सरदार पठाण यांनी विजय खेचून आणला.

दोन दिवसीय शिबीर
भारत राष्ट्र समिती पक्षाची दोन दिवसीय राज्यस्तरीय बैठक नांदेड येथे सुरु झाली आहे. 19 आणि 20 मे असे दोन दिवसीय हे शिबीर आहे. या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे अशी माहिती पक्षाच्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बीआरएसने ही बैठक आणि शिबीर आयोजीत केले आहे.

केसीआर साधणार संवाद
केसीआर या बैठकीला हजेरी लावणार आहेत. तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. मराठवाड्यात पक्षा वाढविण्यासाठी आणि तो मजबूत करण्यासाठी केसीआर यांनी बैठकांचं सत्र आयोजीत करण्यावर भर दिला आहे. याच दरम्यान बीआरएसचा पहिला उमेदवार विजयी झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

तेलंगणा पॅटर्न
तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारी करत आहे. त्याच बरोबर केसीआर इतर राज्यातही बीआरएसचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही ठिकाणी माजी आमदार, मोठे नेते त्यांच्या गळाला लागले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष जोरकसपणे उतरणार आहे.