Sangli Flood : कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगली जिल्ह्यातील 25 मार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प

| Updated on: Jul 23, 2021 | 5:28 PM

पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 25 ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यात 8 राज्यमार्ग आणि 18 जिल्हामार्गांचा समावेश आहे. यामध्ये शिराळा, पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे.

Sangli Flood : कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगली जिल्ह्यातील 25 मार्ग पाण्याखाली, वाहतूक ठप्प
सांगली जिल्ह्यातील 25 रस्ते पाण्याखाली
Follow us on

सांगली : राज्यात रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हाहा:कार माजवला आहे. या तिन जिल्ह्यात दरड कोसळून 60 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील या दोन प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर या पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 25 ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यात 8 राज्यमार्ग आणि 18 जिल्हामार्गांचा समावेश आहे. यामध्ये शिराळा,पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील रस्त्यांचा समावेश आहे. त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक अन्य मार्गांवरुन वळवण्यात आली आहे. (Krishna and Varna rivers in Sangli district flooded)

कोल्हापूर आणि सांगलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. असं असलं तरी कोल्हापूर, सांगलीमध्ये यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. कृष्णा खोऱ्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पाणी सोडावं लागलं. त्यामुळे सांगली आणि परिसरात पुरस्तिथी निर्माण झाली आहे. मात्र, यंत्रणा सज्ज असल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.

शिरगावला चारही बाजूने पाण्याचा वेढा

सांगलीतील शिरगावला चारही बाजूने पाण्याने वेढल्याने नागरिक अडकले आहेत. मात्र, शिरगावातून 200 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. संध्याकाळपर्यंत अजून 1 हजार 200 जणांना बाहेर काढलं जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. ते पिंपरीमध्ये बोलत होते. कर्नाटकसरकार बरोबर चर्चा सुरु आहे. अलमट्टी धरणातून 2 लाख क्युसेक्सनं पाणी सोडावं अशी विनंती केली आहे. मात्र, अजून पाणी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहचले आहे. त्याची माहिती अलमट्टीपर्यंत दिल्याचं पाटील म्हणाले. ज्या भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे, त्या भागात मुख्यमंत्र्यांसह मंत्री जातील, पण आज लोकांना वाचवणं महत्वाचे आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कंट्रोल रूममध्ये बसून मदतीचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करत आहेत. आपणही सांगलीत पोहोचत आहोत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

सर्व ठिकाणी सर्वतोपरी मदत – पाटील

कालपासून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे. फक्त शिरगावला चहुबाजूंनी पाण्याने वेढलं आहे. तिथून देखील 200 नागरिकांना बाहेर काढलं आहे. आताही तिथं बचावकार्य सुरु आहे. संध्याकाळपर्यंत इथले लोक सुखरूप बाहेर येतील. त्यामुळे सर्व ठिकाणी सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे. त्यामुळे सरकारचे कोणतेही दुर्लक्ष नाही, असा दावा पाटील यांनी केलाय.

संबंधित बातम्या :

चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आला; व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

Raigad Taliye Landslide | रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 38 जणांचा मृत्यू, तळीये गावात भीषण दुर्घटना

Krishna and Varna rivers in Sangli district flooded